काल दिवसभरात 48,698 कोरोनाबाधितांची नोंद, तर 1183 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होत असल्याचे दिसत आहे. मागील पाच दिवसांत दुसऱ्यादा कोरोनाबाधितांची संख्या ही 50 हजारांच्या आत आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात देशात 48,698 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे, तर 1183 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच मागील 24 तासात देशात 64,818 जण कोरोनामुक्त झाले आहेत. काल एकाच दिवसात 17,303 सक्रिय रुग्णाची घट झाल्याचे दिसून आले आहे.

देशातील कोरोनाचा मृत्यू दर हा 1.31 टक्के इतका आहे तर रिकव्हरी दर हा 97 टक्के एवढा आहे. देशात सक्रिय रुग्णसंख्या ही दोन टक्के एवढी झाली आहे. सक्रिय रुग्णांच्या बाबतील भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो.

महाराष्ट्रात काल दिवसभरात शुक्रवारी 9,677 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 10,138 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 57,72,799 एवढी झाली आहे. तर काल दिवसभरात 156 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात सध्या 1,20,715 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.94 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,05,96,965 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,17,035 (14.82 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,33,748 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,248 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत 3 कोटींहून अधिक डोस देणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. काल सायंकाळी सातपर्यंत सुमारे 4 लाख 80 हजार नागरिकांना लस देण्यात आली.