चक्काजाम आंदोलनावरुन मुख्यमंत्र्यांनी काढला फडणवीसांना चिमटा


कोल्हापूर – प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप आज ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरला आहे. चक्क जाम आंदोलनाची हाक देत भाजपने सकाळपासून आंदोलनाला सुरूवात केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात आंदोलन सुरू असताना सारथीच्या कोल्हापूरातील उपकेंद्राचे उद्घाटन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. अनेकजण आदळआपट करत आहेत. पण त्याविषयी मी तुर्तास फार बोलणार नाही. गर्दी करून ताकद दाखवता येते. पण, त्यामुळे कोरोनाची साथ पसरण्याचा धोका असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमात बोलताना ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने छेडलेल्या राज्यव्यापी आंदोलनावर अप्रत्यक्षपणे टोला लगावला. संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचे, हे ज्याला कळते तोच खरा नेता असतो. गर्दी करून ताकद दाखवता येते. पण त्यामुळे कोरोनाची साथ पसरण्याचा धोका असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात नाती ओढूनताणून पुढे नेता येत नसल्याचे वक्तव्य केले. पण, त्यांच्या या वक्तव्याचा रोख कुणाच्या दिशेने होता, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी सारथी उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना छत्रपती संभाजीराजे यांचे कौतुक करत मराठा समाजाचे आभार मानले. न्याय व हक्कांसाठी रस्त्यावर उतरणे हा भाग आहे. पण संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी करायचा हे ज्याला कळते तोच नेता होऊ शकतो. संभाजीराजे तुम्ही संघर्ष थांबवून संवाद सुरु केला. पण अनेकजण आदळआपट करत आहेत. पण त्याविषयी मी तुर्तास फार बोलणार नसल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे फडणवीसांना टोला लगावला.

मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वाटले असते, तर काहीही करु शकला असता. आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला काही कायदेशीर अडथळे पार करायचे आहेत. कायद्याची लढाई आपण सोडून दिलेली नाही. आपला समजुतदारपणा समाजाला दिशा दाखवणार आहे. मराठा समाजासाठी जे जे काही करता येईल ते सर्व सरकारकडून केले जाईल. सरकार कोणत्याही प्रकारे मागे राहणार नसल्याचे वचन मी तुम्हाला देतो, असे मुख्यमंत्री ठाकरे कार्यक्रमप्रसंगी म्हणाले.