आता ‘या’ प्रकरणात भाजपने केली अजित पवारांच्या सीबीआय चौकशीची मागणी!


मुंबई – मार्च महिन्यात महाराष्ट्रात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे खळबळ उडाली होती. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांची देखील या प्रकरणामध्ये सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

यासंदर्भातील प्रस्ताव भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यानंतर भाजपने आपला मोर्चा थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वळवल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अँटिलिया स्फोटके आणि त्यानंतर झालेल्या मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक केली आहे.

अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना खंडणी गोळा करण्याचे आदेश दिल्याचा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रामध्ये केला होता. अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट्समधून महिन्याला १०० कोटींची रक्कम गोळा करण्याचे आदेश दिल्याचे पत्रात नमूद करण्यात आले होते. या पत्रामुळे मोठा गदारोळ झाल्यानंतर अखेर अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यासंदर्भात सध्या न्यायालयात सुनावणी सुरू असून अनिल देशमुख यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

दरम्यान, विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून या प्रकरणानंतर सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आज हा ठराव पारित केल्यानंतर आता अजित पवार आणि अनिल परब यांच्याविरोधातील आपला पवित्रा भाजप अधिक आक्रमक करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ५ जुलै रोजी होणाऱ्या राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनामध्ये या मुद्द्यावरून देखील विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात पुन्हा एकता आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळू शकतात.