विजय माल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीची ९ हजार कोटींची संपत्ती बँकांकडे हस्तांतरित


नवी दिल्ली – अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने बँकांना गंडा घालून परदेशात फरार झालेल्या विजय माल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना मोठा झटका दिला आहे. सार्वजनिक बँकांचे कर्ज बूडवून तिन्ही उद्योगपतींनी परदेशात पोबारा केला आहे. ईडीने या प्रकरणात नीरव मोदी, विजय माल्ल्या आणि मेहुल चौक्सी यांची १८ हजार १७० कोटींची मालमत्ता जप्त केली होती. यापैकी ९ हजार कोटींची संपत्ती ईडीने कर्ज बुडवण्यात आलेल्या सार्वजनिक बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित केली आहे.

उद्योगपती विजय माल्ल्या, हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची ईडीने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी संपत्ती निवारण अधिनियम २००२ अर्थात पीएमएलए कायद्यातंर्गत १८ हजार १७० कोटींची संपत्ती जप्त केली होती. या संपत्तीपैकी ९ हजार ३७१.१७ कोटींची संपत्ती कर्ज बुडवलेल्या सार्वजनिक बँकांकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.

या संपत्ती हस्तांतरण प्रक्रियेबद्दलची माहिती ईडीने ट्वीट करून दिली आहे. फक्त संपत्ती निवारण अधिनियम २००२ अर्थात पीएमएलए कायद्यातंर्गत विजय माल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या प्रकरणात १८,१७०.०२ कोटी (बँकांच्या एकूण नुकसानीपैकी ८०.४५ टक्के रक्कम) रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. यापैकी ९३७१.१७ कोटी रुपये मूल्यधारणा असलेली संपत्ती सरकारी बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित केल्याची माहिती ईडीने दिली आहे.

काही बँक अधिकाऱ्यांना हाताशी धरून मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बॅंकेत १३,५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. सध्या लंडनमधील एका तुरूंगात नीरव मोदी असून, मेहुल चोक्सी डोमिनिकातील तुरूंगात आहे. दोघांविरुद्धही सीबीआय चौकशी करत असून, त्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. दुसरीकडे ९००० कोटींचा घोटाळा आणि बेहिशोबी मालमत्ता जमविल्या प्रकरणी विजय माल्ल्याची चौकशी सुरू आहे. यात किंगफिशर एअरलाईन्सचा समावेश आहे.