कंगना राणावतने देशाच्या नावावरून केले मोठे वक्तव्य


आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना राणावत कायमच चर्चेत असते. ट्विटरने कगनाचे अकाऊंट बंद केले असले तरी कंगना इन्स्टाग्राम आणि आता कू अ‍ॅपवरून तिचे परखड मत मांडत असते. कंगनाने नुकतीच तिच्या इन्स्टास्टोरीवर एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टमुळे कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

देशाचे नाव बदलण्याची गरज असल्याचे कंगनाने तिच्या पोस्टमध्ये म्हंटले आहे. देशाचे ‘इंडिया’ हे नाव बदलून ‘भारत’ असे करण्याची इच्छा कंगनाने व्यक्त केली आहे. ब्रिटीशांनी ‘इंडिया’ हे नाव ठेवले असून ते गुलामगिरीची आठवण करून देणारे असल्याचेही ती म्हणाली. कंगनाने यावेळी इंडिया आणि भारत या शब्दांचा अर्थ तिच्या पोस्टमध्ये स्पष्ट केला आहे.

कंगना आपल्या पोस्टमध्ये भारत शब्दाचा अर्थ सांगताना म्हणाली, आपल्याला ‘इंडिया’ हे गुलामीचे नावे ब्रिटीशांनी दिले आहे. ज्याचा अर्थ केवळ सिंधू नदीच्या पूर्वेकडील देश असा होतो. आपण एखाद्या लहान मुलाला लहान नाक , दुसरा मुलगा किंवा त्याहून वाईट म्हणजे सी-सेक्शन अशा नावाने उल्लेख करू का? हे कसले नाव असल्याचे म्हणत तिने भारत या शब्दाचा अर्थ सांगितला. भारत हा संस्कृत शब्द आहे. भा म्हणजे भाव. र म्हणजे राग आणि त म्हणजे ताल असा आहे. आपण गुलाम होण्याआधी सांस्कृतिक आणि कलात्मकतेच्या बाबतीत खूपच विकसित होतो, असे तिच्या पोस्टमध्ये कंगना म्हणाली आहे.

दरम्यान कंगनाने यासंदर्भातील तिचे कू अ‍ॅपवर आणि फेसबुकवर देखील मत मांडले आहे. जर असेच आपण पाश्चिमात्य देशाच्या नावीची कॉपी बनून राहिलो, तर आपला देश कधीच प्रगती करू शकणार नाही. एक राष्ट्र म्हणून आपल्याला प्राचीन ज्ञानाची मदत घेवून विकास करणे गरजेचे आहे. तेव्हाच भारत पुढे जाईल, जेव्हा आपण आपली प्राचीन सभ्यता आणि संस्कृती यावर विश्वास ठेवून त्या मार्गाने पुढे जाऊ, असे म्हणत कंगनाने सर्वांनी योग, वेद आणि गीता यांचे अनुकरण करणे गरजेचे असल्याचे म्हणाली. यावेळी पुन्हा एकदा कंगनाने देशाचे नाव इंडियावरून भारत करावे, असे मत मांडले आहे.