‘तो’ निर्णय स्थगित केल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांची उद्धव ठाकरेंवर नाराजी!


मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा एक निर्णय स्थगित केला आणि त्यावरुन विरोधकांकडून निशाणा साधला जाऊ लागला. मुख्यमंत्र्यांनी जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेला निर्णय स्थगित केल्यामुळे त्याला सत्ताधाऱ्यांमध्ये विसंवाद असल्याचे स्वरूप दिले जाऊ लागले. आता खुद्द जितेंद्र आव्हाड यांनीच या वादावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्या ठिकाणी कॅन्सरग्रस्त रुग्ण राहणार असल्याचे मत पूर्णपणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. त्यामुळे आता नेमके कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांसाठीच्या घरांचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

राज्यभरातून आणि देशभरातून मोठ्या संख्येने रुग्ण मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात कर्करोगावर उपचार करून घेण्यासाठी येत असतात. त्यांचे नातेवाईक देखील या रुग्णांसोबतच रुग्णालयात येतात. कर्करोगावरचे उपचार दीर्घकाळ चालत असल्यामुळे या नातेवाईकांची राहण्याची अडचण निर्माण होते. हे नातेवाईक अनेकदा रुग्णालय आवारात, रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर राहतात. या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या शिवडीतील विघ्नहर्ता आणि सुखकर्ता या पुनर्विकसित इमारतींमधील १०० सदनिका या नातेवाईकांना राहण्यासाठी देण्याचा निर्णय जितेंद्र आव्हाड यांनी घेतला होता. यानंतर या सदनिका टाटा रुग्णालयाकडे हस्तांतरीत देखील करण्यात आल्या होत्या. पण, अंमलबजावणीनंतर त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली होती.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. कॅन्सरचा कोणताही पेशंट तिथे राहणार नाही. टाटामध्ये रुग्ण दाखल झाल्यानंतर दोन-तीन महिने उपचार चालतात. तिथे त्याचे नातेवाईक येत असतात. ज्या अवस्थेत ते राहतात, ती अवस्था माणुसकीला धरून नाही. म्हणून त्यांना आपण घरे दिली, तर आपल्याकडून एक मानवी सेवा होईल, या दृष्टीने तो प्रयत्न होता. कॅन्सरचे पेशंट तिथे राहतील, हे मत पूर्णपणे चुकीचे आहे. यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही. बाहेर गावाहून येणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी, या एकाच उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला होता. पण या निर्णयाला स्थगिती देणे ही दुर्देवाची बाब असल्याचे आव्हाड म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांकडे शिवडीतील शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी तक्रार केल्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. माझी दखल जितेंद्र आव्हाडांनी घेतली नाही. माझी दखल न घेतल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जावे लागले. जितेंद्र आव्हाड यांना दोन पत्रे लिहिली, पण दखल घेतली नाही. माझ्याकडे कागदोपत्री पुरावे आहेत. माझ्या मतदार संघातील सुखकर्ता आणि विघ्नहर्ता या पुनर्विकसित इमारतींमध्ये ७०० मराठी कुटुंब राहतात. येथील १०० सदनिका कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी देण्याच्या म्हाडाच्या निर्णयामुळे या रहिवाश्यांमध्ये भितीचे वातावरण पसरल्याची भूमिका आमदार चौधरी यांनी मांडली आहे.

दरम्यान, शिवडीतील म्हाडा वसाहतीतीत सदनिकांऐवजी भोईवाडा येथील वसाहतीतील सदनिका कर्करोगग्रस्तांच्या नातेवाईकांना देण्यात याव्यात, अशी पुष्टी देखील आमदार चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात जोडली आहे.