कॅन्सरग्रस्तांसाठी म्हाडाने दिलेल्या 100 खोल्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती


मुंबई : एकीकडे काँग्रेसने स्वबळाचा सूर आवळलेला असला तरी दुसरीकडे शिवसेनेशी हातमिळवणी कायम ठेवण्याचे राष्ट्रवादीने जाहीर केले आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्याच राष्ट्रवादीला झटका दिल्याच्या चर्चा सुरु असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी परळमधील टाटा रुग्णालयातील कॅन्सरग्रस्तांसाठी म्हाडाच्या 100 खोल्या राखीव ठेवणार असल्याचा निर्णय गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केला होता. पण मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

टाटा हॉस्पिटलमधील कॅन्सरग्रस्तांसाठी या म्हाडाच्या खोल्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकारानंतर राखीव ठेवण्यात आल्या होत्या. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते या खोल्यांच्या चाव्यांचे वाटपही करण्यात आले होते. पण या विरोधात शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी तक्रार केली होती. कॅन्सरग्रस्तांसाठी ज्या इमारतीमधील खोल्या राखीव ठेवण्यात आल्या होत्या, त्या इमारतीमधील रहिवाशांची तक्रार असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला स्थगिती दिली आहे. पण मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी कोणत्याही राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केली नाही आणि परस्पर या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे आता महाविकास आघाडीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोणतीही चर्चा न करता राष्ट्रवादीने घेतलेल्या एका मोठ्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत मतमतांतरे आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लवकरच यासंदर्भातील खुलासा आणि एवढ्या मोठ्या निर्णयाला स्थगिती का देण्यात आली, याबाबतचे स्पष्टीकरण जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे संपूर्ण भारतातून कॅन्सरबाधित रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. मात्र, अनेकवेळा येथे येणारे रुग्ण हे गरीब घरातून असल्यामुळे रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांसाठी राहण्याच्या जागेचा प्रश्न निर्माण होत असतो. अनेक वेळा हे नातेवाईक हॉस्पिटलच्या आजुबाजूच्या परिसरात मिळेल त्या ठिकाणी, फूटपाथावर, पुलाखाली राहत असतात. त्याच्याबद्दलची कैफियत अनेकवेळा माध्यमांमधून मांडण्यात आली आहे.

पण त्यानंतर काही सामाजिक संस्था तात्पुरती व्यवस्था करतात, परंतु पुन्हा आहे, ती परिस्थिती निर्माण व्हायची. अखेर यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्याचे कायम म्हाडाने केले असून त्यांनी टाटा रुग्णालयाजवळ असणाऱ्या इमारतीत 100 फ्लॅट देण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयामुळे रुग्णांचे आणि नातेवाईकाचे हाल व्हायचे ते थांबणार असून रुग्णांसाठी हा मोठा दिलासा असल्याचं सांगण्यात आले होते.

याबाबत माहिती देताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले होते की, टाटा रुग्णालयाजवळ असलेल्या इमारतीत म्हाडातर्फे 100 फ्लॅट रुग्ण आणि नातेवाईकांना राहण्यासाठी दिले आहेत. यापुढे त्या खोल्यांचे नियोजन कशा पद्धतीने असावे याचे सर्व अधिकार हे टाटा मेमोरियल हॉस्पिटल व्यवस्थापनाला असणार आहेत. यामध्ये शासन कुठलाही हस्तक्षेप करणार नाही.

या रुग्णांची गेले अनेक वर्ष परवड होत होती. हा निर्णय आम्ही घेऊ शकलो याचे समाधान आहे. सगळ्यांनाच माहिती आहे की, येथे बाहेरगावावरून जे गरीब रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येथे उपचार घेण्यासाठी येत असतात, त्यावेळी त्यांच्या रहाण्याच्या प्रश्नांवर खूप हाल होतात. त्यामुळे आजच्या या निर्णाणयामुळे काही प्रमाणात हा प्रश्न निकालात निघेल अशी आशा आहे.