काल दिवसभरात 50,848 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 1358 जणांनी गमावला जीव


नवी दिल्ली – आतापर्यंत देशभरात तीन कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी तीन लाख 90 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 50,848 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात झाली आहे. तर 1358 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. तसेच काल दिवसभरात 68,817 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात सलग 41व्या दिवशी कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. देशभरात 22 जूनपर्यंत 29 कोटी 46 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 54 लाख 24 हजार लसीचे डोस देण्यात आले. तसेच आतापर्यंत 39 कोटी 59 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 19 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या. ज्यांचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून अधिक आहे.

देशातील कोरोनाचा मृत्यूदर 1.30 टक्के आहे, तर रिकव्हरी रेट जवळपास 96 टक्के आहे. अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत घट होऊन 3 टक्क्यांहून कमी झाली आहे. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णसंख्येच्या यादीत भारत जगभरात तिसऱ्या स्थानी आहे. एकूण बाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.

दरम्यान महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाबाधितांचा रोजचा आकडा काही दिवसांपासून दहा हजारांच्या खाली आला आहे. आज 8 हजार 470 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर काल 9 हजार 046 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,42,258 एवढी झाली आहे. आज 188 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 1.98 टक्के एवढा आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.9 टक्के एवढे झाले आहे. राज्यात काल 188 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.98 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,98,86,554 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,87,521 (15.01टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,58,863 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,196 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात काल रोजी एकूण 1,23,340 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

तर आर्थिक राजधानी मुंबईत कोरोना संसर्गाची दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे. कोरोना रुग्णसंख्येचा डबलिंग रेट हा 722 दिवसांवर गेला आहे. मंगळवारी मुंबईत कोरोनाचे 570 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 742 रुग्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. दरम्यान, कोरोनामुळे मंगळवारी 10 रुग्णांचा मृत्यू झाले असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.