राज ठाकरेंच्या ‘त्या’ भूमिकेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीचा विरोध


मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव देण्यात येणार असल्याची भूमिका घेतली आहे. पण, नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक भूमिका असून त्यांच्याशी आम्ही सहमत नसल्याचे मत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीने मांडले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची मागणी कृती समितीने केली आहे.

मुंबईमध्ये असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईत शिफ्ट होणार नसल्यामुळेच राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा विचार केला आहे. जर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव सरकार देणार असेल, तर याला प्रकल्पग्रस्त आगरी कोळी जनतेचा तीव्र विरोध असेल, अशी भूमिका कृती समितीने घेतली आहे. येत्या 24 जून रोजी यासाठी सिडकोवर मोर्चा काढण्यात येणार असून 1 लाखांवर जनता सहभागी होणार असल्याचे कृती समितीने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासाठी मुख्यमंत्री शिवसैनिक रस्त्यावर उतरवणार असतील, तर याला प्रकल्पग्रस्त जनता तोडीसतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या वादावर आपली भूमिका मांडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नावच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला संयुक्तिक असल्याचे राज ठाकरे म्हणाले. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीही शिवरायांचेच नाव सूचवले असते, असेही त्यांनी म्हटले. नवी मुंबई विमानतळाच्या नामकरण मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राज ठाकरे यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.