काँग्रेसने आगामी निवडणूक स्वतंत्र लढवली पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा स्वबळाचा नारा


मुंबई – राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला दीड वर्ष पूर्ण झाली असतानाच स्वबळाचा नारा दिला जात असल्यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला असताना दुसरीकडे राष्ट्रवादीसोबत युती करावी लागेल असे सूचक व्यक्तव्य शिवसेनेने केले आहे. या सर्व घडामोडींदरम्यान आगामी निवडणूक पक्षाने स्वतंत्र लढवली पाहिजे असे मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील व्यक्त केले आहे. त्यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

त्यांना यावेळी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आता धोक्यात आले आहे का? असे विचारण्यात आले असता त्यांनी नकार दिला. अजिबात नाही, हे सरकार भाजपला बाहेर ठेवण्याच्या दृष्टीकोनातूनच स्थापन करण्यात आले होते. त्यांनी राज्यात सर्व गोंधळ घातला होता. अद्यापही आमचे उद्दिष्ट तेच आहे. काही जिल्ह्यांमध्ये काँग्रेस एवढी मजबूत नसून आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे.

पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असावा असे तुम्ही म्हटले असल्याचे विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात काँग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे. जर काँग्रसेची पहिल्या क्रमांकावर येण्याची इच्छा असेल, तर त्यात चुकीचे काय आहे? आमच्या आमदारांची संख्या जर जास्त असेल तर आमचा मुख्यमंत्री होईल. आतापर्यंत अशीच पद्धत राहिली आहे.

पृथ्वीराज चव्हाण शिवसेनेसोबत असणाऱ्या वैचारिक मतभेदासंबंधी बोलताना म्हणाले की, त्याकडे तुम्ही हवे तसे पाहू शकता. पण हे सरकार एका विशिष्ट ध्येयाने स्थापन करण्यात आले आहे. शिवसेनेची विचारसरणी आम्ही सहन करु शकतो, पण भाजपची अजिबात नाही.

दरम्यान भाजपविरोधात महाआघाडीची चाचपणी शरद पवार करत असून त्यात काँग्रेसची काही भूमिका आहे का? असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, काही विरोधकांची बैठक शरद पवार यांनी बोलावली आहे. ते स्वागतार्ह आहे. अशा सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे. यासाठी कोणती यंत्रणा तयार करण्यात आली आहे हे वेळेसोबत कळेल. जर शरद पवार भाजपशी लढत असतील तर स्वागत आहे. त्याची चिंता आम्हाला का असावी?. शिवसेनेपासून राहुल गांधी सावध भूमिका घेतात का? असे विचारण्यात आले असता त्यांनी, हे खरे नसून युती झाल्याची माहिती दिल्लीत दिली. शिवसेनेच्या पार्श्वभूमीमुळे थोडीशी भीती होती, पण आम्ही राष्ट्रीय नेतृत्वाला संमत केले.