महाराष्ट्रावर आणखी एक संकट; महाबळेश्वरमधील वटवाघळांमध्ये आढळला ‘निपाह व्हायरस’


पुणे – एकीकडे राज्यावर कोरोनाचे संकट ओढावलेले असतानाच दुसरीकडे राज्याच्या चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. राज्यात वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह व्हायरस आढळला असल्याची माहिती पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात समोर आली असून निपाह व्हायरस महाराष्ट्रात प्रथमच आढळला आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, महाबळेश्वरमधील एका गुहेत मार्च २०२० मध्ये हे वटवाघूळ सापडले होते. शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रजातींच्या वटवाघुळांचे नमुने घेत संशोधन केले होते.

दरम्यान याआधी महाराष्ट्रात वटवाघुळाच्या कोणत्याही प्रजातीत निपाहचे विषाणू आढळले नव्हते अशी माहिती या अभ्यासाचे प्रमुख असणारे डॉक्टर प्रज्ञा यादव यांनी दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने रोगांच्या यादीत पहिल्या १० मध्ये निपाह व्हायरसला ठेवले असून हा खासकरुन वघटवाघुळांमध्येच आढळतो. हा विषाणू माणसांपर्यंत पोहोचल्यास मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याची शक्यता असते. केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे २०१८ मध्ये मृत्यूतांडव झाला होता.

नुकतीच अभ्यासात समोर आलेली माहिती एनआयव्हीने प्रसिद्ध केली आहे. यानुसार भारतात आतापर्यंत चार वेळा निपाह व्हायरस समोर आला आहे. निपाह व्हायसरवर कोणतेही औषध किंवा लस नसून तो सर्वात धोकादायक मानला जातो. यामध्ये मृत्यूदरही खूप आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर एक ते दोन टक्के असून निपाह व्हायरसमध्ये मृत्यूदर हा ६५ ते १०० टक्के एवढा आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये वटवाघळांमुळे इबोलासारखे गंभीर व्हायरस समोर आले होते, ज्यामुळे आरोग्यव्यवस्था कोलमडली होती. कोरोनाच्या उद्रेकामागेदेखील वटवाघूळ असल्याचाच दावा आहे. केरळमध्ये निपाह व्हायरसने २०१८ मध्ये थैमान घातले होते. भारतात याआधी २००१ मध्ये पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्ये निपाह व्हायरस आढळला होता. तसेच आसाममध्येही निपाहचे रुग्ण आढळून आले होते.