नवी मुंबई विमातनतळ नामकरणाच्या वादात राज ठाकरेंची उडी


मुंबई – सध्या नवी मुंबई विमातनतळ नामकरणावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असताना दि बा पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या वादावर भाष्य केले असून नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव असावे असे मत मांडले आहे. मुंबईतील निवासस्थानी आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते.

स्थानिकांकडून नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. तर सरकारने बाळासाहेबांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. यातून संघर्ष होत असून पाठिंबा मागण्यासाठी माझ्याकडे प्रशांत ठाकूर आले होते, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली. जेव्हा कोणतेही विमानतळ येते, तेव्हा ते शहराच्या बाहेर येते. त्यामुळे तेव्हाच्या मुंबईप्रमाणे ते सांताक्रूझमध्ये आले. नंतर वाढवत ते सहारपर्यंत गेले आणि त्याला सांताक्रूझ आणि सहार विमानतळ असे नाव मिळाले.

जेव्हा नवी मुंबईच्या विमानतळाचा प्रस्ताव आला, तेव्हा मला आत्ताचे विमानतळ देशांतर्गत आणि ते विमानतळ आंतरराष्ट्रीय होणार अशी माहिती देण्यात आली होती. जरी ते नवी मुंबईत, पनवेलमध्ये होत असले तरी ते मुंबई विमानतळच असणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळच नाव राहणार असे मला वाटते. हे सध्याच्या देशांतर्गंत विमानतळाचा विस्तारित भाग आहे. हा महाराष्ट्राचा असून मुंबई राजधानी आहे. परदेशातून व्यक्ती महाराष्ट्रात येतो तेव्हा शिवरायांच्या भूमित येतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळालाही शिवरायांचे नाव असावे असे मला वाटते, असे राज ठाकरेंनी सांगितले आहे.

सिडकोने हे काही मंजूर केले आणि राज्याने प्रस्ताव केला असे नाही. हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नावाने होईल. बाळासाहेब किंवा दि. बा. पाटील यांच्या मोठपणाबद्दल दुमत नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल आपण बोलत आहोत या गोष्टींचे भान असायला हवे. जे नाव आहे ते कसे बदलणार?, अशी विचारणा राज ठाकरेंनी यावेळी केली.

बाळासाहेब असते तर त्यांनी स्वत: सांगितले असते की छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव असायला हवे. नामांतराचा वाद हेच दुर्दैव आहे. खरंतर विमानतळ लवकर होण्यासाठी राज्य सरकारने रेटा लावला पाहिजे. अडचणी येत असतील तर ते सोडवण्याला प्राधान्य दिले पाहिजे. नावात वैगेरे सगळे लोकं गुंतून राहतात म्हणून ते सोयीचे असते.

महाराष्ट्रात येणारे विमान शिवाजी महाराजांच्या भूमीत येणार असल्यामुळे त्यांचेच नाव असायला हवे, असे राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे. महाराजांचे नाव देणार असतील, तर आम्ही विरोध करणार नसल्याचे प्रशांत ठाकूर म्हणाल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

आता कोण रस्त्यावर उतरते ते बघू असे सांगताना वेळ आली तर उद्धव ठाकरेंशी बोलेन. पण यामध्ये काही विषय दिसत नसल्याचे राज ठाकरेंनी सांगितले आहे. तसेच ज्यांना राजकारण करायचे आहे ते त्यांनी करावे. पण होणार काय ते मी सांगितले असल्याचेही म्हणाले.

दरम्यान दि बा पाटील यांचे नाव देण्याची भूमिका मनसेचे आमदार राजू पाटील यांनी घेतल्यासंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, माझ्या भेटीला राजू पाटील आले होते. त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली, तेव्हा हा विषयच संपला असे त्यांनी सांगितले. महाराजांच्या पुढे अजून कोणाचे नाव येऊच शकत नाही. महाराज आपली ओळख आहेत. महाराजांच्या भूमितील आपल्या ओळखतात. त्यामुळे जो कोणी येथे येईल, तो महाराजांच्या भूमित येईल, असे ते म्हणाले.