काल दिवसभरात 53,256 कोरोनाबाधितांची नोंद, तर 1422 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली – तब्बल 88 दिवसांनंतर देशात सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी 60 हजारांहून कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 53,256 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 1422 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच काल दिवसभरात 78,190 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

देशात सलग 39व्या दिवशी कोरोनाच्या नव्या बाधितांच्या संख्येहून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. देशभरात 20 जूनपर्यंत 28 कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 30 लाख 39 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर आतापर्यंत 39 कोटी 24 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात जवळपास 14 लाख कोरोना चाचण्यांचे सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. ज्यांच्या पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून अधिक आहे.

कोरोनामुळे देशातील मृत्यूदर 1.29 टक्के एवढा आहे. तर रिकव्हरी रेट जवळपास 96 टक्क्यांवर आहे. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत भारत जगात तिसऱ्या स्थानी आहे. एकूण बाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.

महाराष्ट्रात काल दिवसभरात 9,361 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 9,101 कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,19,457 एवढी झाली आहे. तर 190 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात सध्या 1,32,241 अॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यात काल 8,912 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर 10,373 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.76 टक्के एवढे झाले आहे. राज्यात 190 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.97 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,95,14,858 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,72,781 (15.12 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 7,96,297 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,683 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.