ज्योतिरादित्य सिंधियांच्या सुरक्षेतील १४ पोलीस कर्मचारी निलंबित


नवी दिल्ली – भाजपचे राज्यसभेतील खासदार ज्योतिरादित्य सिंधियांच्या सुरक्षेमध्ये मोठा गोंधळ झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. दिल्लीवरुन ग्वाल्हेरला येताना ज्योतिरादित्य सिंधिया प्रवास करत असलेली गाडीला निरावली ते हाजीरा चौक या सात किलोमीटरच्या प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची सुरक्षा देण्यात आली नव्हती. फटका ग्वाल्हेर आणि मुरैना पोलीस स्थानकातील १४ पोलीस कर्मचाऱ्यांना या गोंधळाचा बसला आहे.

बेजबाबदारपणाचा ठपका या पोलीस कर्मचाऱ्यांवर ठेवत त्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले आहे. ज्योतिरादित्य सिंधिया बसलेल्या गाडीऐवजी दुसऱ्याचा गाडीला पोलिसांच्या गाड्या सुरक्षा देत होते. रात्रीच्या वेळेस मलगढा येथे हाजीरा पोलीस स्थानकाचे प्रमुख आलोक परिहार यांनी ज्योतिरादित्य सिंधिया बसलेली गाडी कोणत्याही सुरक्षेशिवाय जात असल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांनी स्वत: आपल्या टीमला सोबत घेऊन या गाडीच्या मागे सुरक्षा पुरवत जयविलास पॅसेलपर्यंत ज्योतिरादित्य यांना सोडून आले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधिया रविवारी दिल्लीवरुन ग्वाल्हेरला आले. दिल्लीवरुन निघाल्यानंतर ग्वाल्हेरला येईपर्यंत सिंधिया यांच्या गाडीला प्रत्येक जिल्ह्यामध्ये पायलेट आणि फॉलो वाहने (नेता बसलेल्या गाडीच्या पुढे आणि मागे सुरक्षा पुरवणाऱ्या गाड्या) मिळाली.

मध्य प्रदेशमधील मुरैनाच्या सीमेमध्ये प्रवेश केल्यानंतर मुरैनामधील पायलट वाहनांनी सिंधियांच्या गाडीच्या पुढे चालण्यास सुरुवात केली. आपल्या जिल्ह्यातील जुन्या छावणीच्या निरवावली पॉइण्टपर्यंत मुरैना पोलीसांच्या गाड्या सिंधिया यांच्या गाडीच्या पुढे चालत होत्या. या ठिकाणी ग्वाल्हेर पोलिसांची टीम सिंधियांच्या गाडीला सुरक्षेमध्ये पुढे नेण्यासाठी तैनात होत्या.

पण दोन जिल्ह्यांमधील पोलीस दलामध्ये ताळमेळ नसल्यामुळे गडबड झाली. त्यामुळेच ग्वाल्हेर पोलिसांच्या टीमने सिंधियांची कार समजून दुसऱ्याच गाडीला सुरक्षा पुरवली. जवळजवळ सात किमी अंतर गेल्यानंतर पोलिसांना आपली चूक कळली. आपल्या गाडीच्या मागे चालणारी गाडी सिंधियांची नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांना समजले. पण तोपर्यंत इकडे ज्योतिरादित्य सिंधिया बरेच पुढे निघून गेले होते.

सिंधियांच्या गाडीला ग्वाल्हेर जिल्ह्याच्या सीमेजवळ असणाऱ्या जुनी छावणी पोलीस स्थानकाअंतर्गत येणाऱ्या निरावली गाव ते हजारी चौकपर्यंतच्या प्रवासात कोणतीच सुरक्षा पुरवण्यात आली नसल्याचे न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. सिंधिया यांनी रात्री सात किमीचा प्रवास कोणत्याही सुरक्षेशिवाय केला. जेव्हा सिंधियांची गाडी हजीरा पोलीस स्थानकाच्या समोरुन गेली, तेव्हा तेथील स्थानिक अधिकारी आलोक परिहार यांची नजर त्यांच्या कारवर पडली. सिंधियांची गाडी सुरक्षेशिवाय एवढ्या रात्री जात असल्याचे पाहून आलोक यांनी तातडीने आपल्या टीमसोबत सिंधियांच्या गाडीच्या पुढे गाडी नेत पायलेटिंग करत त्यांना जयविलास पॅलेसपर्यंत पोहचवले.

या प्रकरणाच्या चौकशीचे पोलिसांनी आदेश दिले तेव्हा ग्वाल्हेर आणि मुरैना पोलीस स्थानाकातील कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा यासाठी कारणीभूत असल्याचे दिसून आले. मुरैना जिल्ह्यामध्ये सिंधिया यांच्या गाडीला फॉलो आणि पायलेटिंग करण्यासाठी रवाना झालेल्या वाहनांमध्ये नऊ पोलीस कर्मचारी होते. तर ग्वाल्हेर जिल्ह्याच्या सीमेमध्ये असणाऱ्या गाड्यांमध्ये पाच कर्मचारी होते.

दोन्ही पोलिसांच्या तुकड्यांनी एकमेकांशी संवाद साधला नाही. ताळमेळ नसल्याने ग्वाल्हेर पोलिसांची गाडी चुकीच्या गाडीला फॉलो करत राहिली. यामुळेच १४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये दोन्ही जिल्ह्यांमधील पाच उप निरिक्षकांचा समावेश आहे.