तब्बल 80 दिवसांनी 60 हजारांहून कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद


नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत असली तरी धोका अद्यापही टळलेला नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. एकीकडे कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट होत असली तरी, मृतांचा आकडा फारसा कमी झालेला नाही. तब्बल 80 दिवसांनी देशात 60 हजाराहून कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 58,419 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 1576 बाधितांनी जीव गमावला आहे. दरम्यान काल दिवसभरात 87,619 लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

सलग 38व्या दिवशी देशात कोरोनाबाधितांच्या नव्या रुग्णांहून कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा अधिक आहे. 19 जूनपर्यंत देशभरात 27 कोटी 66 लाख 93 हजार कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 38 लाख 10 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत 39 कोटींहून अधिक कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात जवळपास 19 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याच्या पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून अधिक आहे.

महाराष्ट्रात काल दिवसभरात 8,912 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 10,373 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,10,356 एवढी झाली आहे. काल 257 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात सध्या 1,32,597 अॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.76 टक्के एवढे झाले आहे. काल राज्यात 257 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.97 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,93,12,920 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,63,420 (15.17 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8,06,506 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,695 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

गेल्या 24 तासात मुंबईत 696 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात 13 मृत्यूंची नोंद मुंबईत झाली आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 790 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आजवर 688340 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईचा ओव्हरऑल रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर गेला आहे. सध्या मुंबईत 14,751 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 720 दिवसांवर गेला आहे.