यापुढे देशाच्या राजकारणात शिवसेना महत्वाची भूमिका बजावेल : खासदार संजय राऊत


मुंबई : शिवसेनेच्या भविष्यासाठीच ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे लिहिले गेले आहे. या पुढे शिवसेनेची भूमिका दिल्लीच्या तख्तासंबंधी विचार करताना अत्यंत महत्वाची असेल असा सूचक इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने बोलताना दिला आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेच्या स्थापनेवेळी मुंबई आणि ठाण्यापुरताच हा पक्ष मर्यादित असणार, असे अनेकजण म्हणायचे. राज्यात आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. राज्याची सीमा ओलांडून दिल्लीपर्यंत शिवसेनेने धडक मारली आहे. राज्याच्या राजकारणात प्रभाव टाकणाऱ्या शिवसेनेचा दिल्लीतील आवाज कायमच बुलंद राहिल असल्यामुळे यापुढे देशाच्या राजकारणात शिवसेना महत्वाची भूमिका बजावेल.

शिवसेनेचे हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही विषय जिव्हाळ्याचे असल्याचे सांगत संजय राऊत म्हणाले की, हिंदुत्व म्हटलं तर शिवसेनेचा चेहरा समोर येतो तर मराठी माणसालाही शिवसेना आपली वाटते. बाळासाहेबांचे हेच स्वप्न घेऊन शिवसेना वाटचाल करत आहे. शिवसेनेचे मराठीपण जसे तळपणाऱ्या तेजासारखे आहे तसेच हिंदुत्वाचे कवचही बुलंद आहे. शिवसेनेने आपला रंग कधी सरड्याप्रमाणे बदलला नाही.

खासदार संजय राऊत दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना म्हणाले की, दिल्लीत शेतकरी गेल्या एक वर्षाहून अधिक काळ आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. आता केंद्र सरकारने दोन पावले पुढे यावे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.

आज मराठी माणसाच्या न्याय्यहक्कांसाठी स्थापन झालेल्या शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिन साजरा होत असून, वर्धापन दिनावर यंदाही कोरोनाचे सावट आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या जरी कमी होत, असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही कायमच आहे. त्यामुळे शिवसेनेने यंदाही पक्षाचा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी सात वाजता शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. अयोध्या राममंदिर, महापालिका निवडणूक आणि शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यावर मुख्यमंत्री आजच्या भाषणात बोलणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.