काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यानंतर आता भाई जगतापांनीही दिला स्वबळाचा नारा


मुंबई : मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी आम्हाला तिसरा पक्ष म्हणतात अशी खंत व्यक्त करत आम्हाला एकट्याला लढू द्या, देखते है किसमे कितना है दम अशी आव्हानाची भाषा केली आहे. स्वबळावर आम्हाला लढू द्या, असा आग्रह भाई जगताप यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यानंतर आता भाई जगतापांनीही स्वबळाचा नारा दिला आहे.

काँग्रेसने राहुल गांधींचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पंतप्रधान करायचेच असा निश्चय काँग्रेस नेत्यांनी केला आहे. त्यासंबंधी एका कार्यक्रमाचे आयोजन मुंबईत करण्यात आले होते. त्यामध्ये बोलताना भाई जगतापांनी आम्हाला तिसरा पक्ष म्हटले जात असल्याची खंत व्यक्त केली. त्यांनी प्रभारी एच.के. पाटील यांच्याकडे येत्या निवडणुका या आम्हाला स्वबळावर लढू द्याव्यात अशी मागणी केली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे महाराष्ट्राच्या प्रभारींनी हा संदेश पोहचवावा अशी विनंतीही त्यांनी केली.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित लढवल्या जातील, असे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सांगितले होते. त्यानंतर शिवसेनेचाही काहीसा तसाच सूर होता. पण महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष मात्र ‘एकला चलो’ चा नारा देत आहेत.

सध्या तरी कोणत्याही निवडणुका नसल्यामुळे सध्या तरी महाविकास आघाडी घट्ट असून हे सरकार पाच वर्षे टिकेल, असे शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे म्हणाल्या. तर राष्ट्रवादीकडूनही तशाच प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. त्या आधी शिवसेना खासदार संजय राऊतांनीही हे सरकार पाच वर्षे टिकेल आणि महाविकास आघाडी बुलंद राहिल, असे सांगितले होते.