सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उपकाराची हीच का परतफेड?; नारायण राणेंचा सवाल!


मुंबई – राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. अनलॉक प्रक्रिया देखील अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू झालेली आहे. राज्यातील नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसत असून, सरकारने काही जिल्ह्यांमध्ये लागू केलेले निर्बंधही काही प्रमाणात शिथिल केले आहेत. तर, काही जिल्ह्यांमधील निर्बंध पूर्णपणे हटवले जात आहेत. पण असे असले तरीही अद्याप सिंधुदुर्ग जिल्हा हा रेड झोनमध्ये आहे. भाजप खासदार नारायण राणे यांनी यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल आहे.

सिंधुदुर्ग-रत्नागिरीने शिवसेनेला स्थापनेपासून साथ केली, त्याबदल्यात शिवसेनेने करोना काळात सिंधुदुर्गात ९०१ तर रत्नागिरीमध्ये १५६१ मृत्यू दिले. याला संपूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहेत. अशी राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंवर थेट टीका केली आहे.


तसेच, दोन्ही जिल्ह्यात डॉक्टर नाही, नर्स, वार्डबॉय, औषध पुरवठा व ऑक्सिजन नाही. एवढ्या वर्षाच्या निष्ठेनंतर सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या पदरी मृत्यू. मुख्यमंत्री हीच का उपकाराची परतफेड? असा सवाल देखील राणेंनी विचारला आहे.

या अगोदर बुधवारी नारायण राणेंची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेट घेतली होती, तेव्हा त्यांच्यात सिंधुदुर्गमधील कोरोना परिस्थितीसह अन्य मुद्यांवर बराचवेळ चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय, नुकताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा देखील राणेंनी घेतलेला आहे. यावरूनच मुख्यमंत्र्यांवर त्यांनी निशाणा साधल्याचे दिसत आहे.