कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण चार महिन्यांपूर्वीच फुल्ल


रत्नागिरी : कोरोनाने मागील वर्षी देशात असे काही थैमान घातले होते, की सण उत्सवांवरही याचे सावट पाहायला मिळाले. हे चित्र यंदाच्या वर्षीही फारसे काही वेगळे नाही. कोकणच्या दिशेने जाणाऱ्या अनेक चाकरमान्यांना मागच्या वर्षी गावी जाणे शक्य झाले नव्हते. प्रशासनाचे नियम आणि कोरोनाचे संकट यांमुळे चाकरमान्यांचा हिरमोड झाला होता.

गावाकडे मागील वर्षी बहुप्रतिक्षित अशा गणेशोत्सवाच्या निमित्ताने जाता न आल्यामुळे अनेकांनी यंदाच्या वर्षी गणेशोत्सव सुरु होण्याआधीच गावाकडे विशेष म्हणजे कोकणच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे तिकीट आरक्षित केले आहे. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे तिकीट चार महिन्यांपूर्वीच बुक करत गावाला जाण्याचे अनेकांनीच निश्चित केले आहे.

कोकणच्या दिशेने गणेशोत्सव काळात जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. या वर्षी 10 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. या दिवसापासून गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे. यासाठी 5 ते 9 सप्टेंबर दरम्यानच्या कोकणाकडे जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या फुल्ल झाल्या आहेत. तर, घरगुती गणेश विसर्जनानंतर म्हणजेच 14 सप्टेंबरनंतर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्यांचे आरक्षणही फुल्ल झाल्याचे दिसत आहे.

दरम्यान अद्यापही कोकणातील काही भागात कोरोनाचे सावट कायम आहे. त्यातच आता येत्या काळात एवढ्या मोठ्या संख्यने मुंबईतील चाकरमानी कोकणच्या दिशेने येणार असतील तर, आरोग्य यंत्रेणेला फार आधीपासूनच यासाठी सतर्क राहावे लागणार असल्यामुळे नागरिकांनी कोरोनाचे भान राखत योग्य ते निर्णय घ्यावेत आणि सण-उत्सव सामाजिक भान जपत साजरे करावेत. कारण, कोरोना अद्यापही संपलेला नाही.