दिलासादायक ! देशातील कोरोनाबळींच्या संख्येत तब्बल 58 दिवसांनंतर घट


नवी दिल्ली : देशावर ओढावलेली कोरोनाची दुसरी लाट आता काही अंशी कमी होताना दिसत आहे. 73 दिवसांनंतर देशातील कोरोनाबाधितांची संख्या आठ लाखांहून कमी झाली आहे, तर 58 दिवसांनंतर मृतांचा आकडा हा दोन हजारांपेक्षा कमी झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात देशात 62,680 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 1587 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर काल दिवसभरात 88,977 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान आतापर्यंत देशात 26 कोटी 89 लाख नागरिकांना कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 32 लाख 59 हजार नागरिकांना कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत. देशातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर हा 1.29 टक्के असून बरे होण्याचे प्रमाण हे 96 टक्के एवढा आहे.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गुरुवारी 9,830 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 5,890 कोरोनामुक्त झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 236 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण 1,39,960 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आजपर्यंत एकूण 56,85,636 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.64 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 236 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.95 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,88,57,644 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,44,710 (15.3 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8,50,663 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,964 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.