मुंबईतील शिक्षकांना लोकल प्रवासाची परवानगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाकारली


मुंबई – मुंबईतील शिक्षकांकडून गेल्या काही दिवसांपासून लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याची मागणी केली जात आहे. यासाठी दोन दिवसांपूर्वी मुंबईत दहावीच्या शिक्षकांनी आंदोलन देखील केले होते. शिक्षकांना शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी जावे लागते. राज्य सरकारने त्यासाठी शिक्षकांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. पण, अखेर ही मागणी राज्य सरकारने फेटाळून लावली आहे. यासंदर्भातील निर्णय खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला असून त्यामुळे या शिक्षकांपुढचा प्रवासासंदर्भातला पेच कायम राहिला आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सीच्या आधारावर संबंधित जिल्हा किंवा महानगर पालिकेचा कोणत्या गटात समावेश होईल, हे ठरवले जात आहे. पण, मुंबईतील पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी गेल्या आठवड्यात कमी होऊन देखील मुंबईत तिसऱ्या गटाचेच निर्बंध लागू ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेकडून घेण्यात आल्यामुळे मुबईकरांना निर्बंधांमधून सूट मिळण्यासाठी अजून वाट पाहावी लागणार आहे.

दरम्यान, लोकल प्रवासाचा पहिल्या आणि दुसऱ्या गटामध्ये समावेश आहे. पण मुंबईत अजूनही तिसऱ्या गटाचे निर्बंध लागू आहेत. या पार्श्वभूमीवर जोपर्यंत मुंबईचा समावेश दुसऱ्या गटात होत नाही, तोपर्यंत शिक्षकांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देता येणार नाही. शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी पर्यायी व्यवस्था करावी, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यमापन करण्यासाठी शाळांमध्ये कसे पोहोचणार? हा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.