…तर आगामी लोकसभा निवडणूक रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढवेन : हर्षवर्धन जाधव


औरंगाबाद : गेल्या काही अनेक दिवसांपासून माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे या सासरा-जावयांचा वाद सुरू आहे. त्यात आता हर्षवर्धन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त काही लोकांनी जालना लोकसभा मतदारसंघात त्यांना शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत आणि फलक लावल्यानंतर जालना लोकसभा मतदारसंघातील लोकांची इच्छा असेल तर, पंचवीस वर्ष सुरू असलेलं दानवाच्या राज्याचे रूपांतर रामराज्यात आपण करू असे, म्हणत थेट येत्या लोकसभा निवडणुकीत सासऱ्यांच्या विरोधातच निवडणुकीत दंड थोपटणार असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी स्पष्ट केले. हर्षवर्धन यांनी काही दिवसांपूर्वीच राजकारणातून संन्यास घेतल्याची घोषणा केली होती. मग सासऱ्यांविरुद्ध निवडणूक लढवण्यासाठी आपली घोषणा ते मोडीत काढणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

या ना त्या कारणाने नेहमीच माजी आमदार हर्षवर्धन जाधव प्रकाश झोतात असतात. ते आता जालना लोकसभा मतदारसंघात त्यांच्याच वाढदिवसानिमित्त लावलेल्या पोस्टरवरून चर्चेत आले आहेत. गेल्या पंचवीस वर्षांपासून जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे हे निर्विवाद निवडून येत आहेत. हर्षवर्धन जाधव यांचे रावसाहेब दानवे हे सासरे आहेत. त्यांचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात काही लोकांनी हर्षवर्धन जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत.

विशेष म्हणजे हर्षवर्धन जाधव यांची मैत्रीण इशा झा यांचादेखील फोटो या फलकावर लावण्यात आल्यामुळे ही बाब निश्चित रावसाहेब दानवे यांना खटकणारी आहे. हर्षवर्धन जाधव यांना या फोटो विषयी विचारले असता त्यांनी म्हटले आहे की जालना लोकसभा मतदारसंघात गेल्या पंचवीस वर्षापासून दानवेंचे राज्य आहे आणि या राज्याचे रूपांतर रामराज्यात करण्यासाठी या मतदारसंघातून लोकांची इच्छा असेल तर आपण निवडणूक लढवायला तयार आहोत.

हर्षवर्धन जाधवांच्या या वक्तव्यामुळे पुढची लोकसभा निवडणूक ही सासरे विरुद्ध जावई म्हणजेच हर्षवर्धन जाधव विरुद्ध रावसाहेब दानवे अशी होण्याची चर्चा मात्र सुरू झालेली आहे. हर्षवर्धन जाधव आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये घरगुती कुरबुरी सुरू आहेत. मध्यंतरी आपल्यावर दाखल झालेल्या गुन्हे हे आपल्या सासऱ्यांनी दाखल केल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता.

त्यांना झालेल्या पुण्यामधील मारहाणीमध्ये देखील रावसाहेब दानवे यांचा हात असल्याचे ते म्हणाले होते. हे वादळ शांत होत नाही, तोच आता हे बॅनर लावण्यात आलेले आहेत. हर्षवर्धन जाधव सासरे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणुकीत उभे राहतील का नाही हे काळच सांगेल.