वाहतुकीचे नियम मोडण्यात पुणेकर अव्वल तर मुंबईकर दुसऱ्या स्थानी


मुंबई : मागील पाच महिन्यांमध्ये महाराष्ट्र वाहतुक विभागाकडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. ज्यामध्ये हेल्मेट न घालणाऱ्यांकडून आतापर्यंत 80 कोटी दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये हेल्मेट न घालण्यामध्ये पुणेकर अव्वलस्थानी तर मुंबईकर दुसऱ्या स्थानी आहेत.

जर दुचाकी चालवत असताना कधी अपघात झाला, तर त्यामध्ये जीव वाचावा म्हणून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. पण हेल्मेट घालणे काहींना त्यांच्या शानच्या विरोधात वाटते आणि अशा लोकांमध्ये पुणेकर पहिल्या तर मुंबईकर दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

जानेवारीपासून ते मे पर्यंत महाराष्ट्र महामार्ग वाहतुक विभागाकडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यामध्येच दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणाऱ्यांचा सुद्धा समावेश होता. यामध्ये पहिल्या 5 महिन्यात 16.15 लाख लोकांकडून विना हेल्मेट दुचाकी चालवणे संदर्भात दंड आकारण्यात आले आहेत आणि यांच्याकडून 80 कोटी रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आले आहेत.

यामध्ये सर्वधिक कारवाया या पुण्यात झाल्या असून पुण्यामध्ये 7.45 लाख लोकांकडून दंड आकारण्यात आला आहे, तर मुंबईमध्ये ही संख्या 3.9 लाखांवर आहे. तर ठाण्यात 78,346 लोकांकडून दंड आकरण्यात आला आहे आणि म्हणूनच लोकांनी जास्तीत जास्त नियमांचे पालन करण्याचे आवाहन महाराष्ट्र महामार्ग वाहतुक विभागाचे एडीजे भूषण उपाध्याय यांच्याकडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्र महामार्ग वाहतुक विभागाकडून फक्त दहा शहरांचे आकडे जाहीर करण्यात आले आहेत त्यामुळे ही संख्या आहे, त्यामध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बाइक चालवताना हेल्मेट घालणे हे बंधनकारक आहे, पण तरी देखील बहुतांश लोकांना बाईक चालवताना हेल्मेट घालणे हे महत्त्वाचे वाटत नाही. ज्यासाठी त्यांच्याकडे विविध कारणे तयार असतात. 2020 साली महाराष्ट्रात 4878 लोकांचे जीव दुचाकी अपघातात गेले होते, यामध्ये 1510 त्यांचे जीव गेले जे मागे बसले होते. या अपघातांमध्ये बहुतांश लोकांनी हेल्मेट घातले नव्हते.