महाराष्ट्रात ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटमुळे एक किंवा दोन महिन्यात येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट


मुंबई – कोरोना टास्क फोर्सने बुधवारी गर्दी वाढली आणि नियम पाळले गेले नाहीत तर एक किंवा दोन महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात येण्याची भीती व्यक्त केली. त्याची गंभीर दखल घेत संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागाला आतापासूनच आवश्यक औषधे, वैद्यकीय उपकरणे शहरी आणि ग्रामीण भागात उपलब्धता आणि पुरेसा साठा राहील याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्रात डेल्टा प्लस प्रकार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण बनू शकतो अशी माहिती अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना संभाव्य तिसऱ्या लाटेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत दिली.

कोरोनाबाधितांची संख्या दुसऱ्या लाटेदरम्यान ‘डेल्टा व्हेरिएंट’मुळे पहिल्यापेक्षा खूपच जास्त असल्यामुळे तिसऱ्या लाटेमध्येही बाधितांची संख्या जास्त असू शकते. राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुमारे १९ लाख आणि दुसऱ्या लाटेत सुमारे ४० लाख रुग्णांची नोंद झाली. तिसऱ्या लाटेत आठ लाख सक्रिय रूग्ण असू शकतात, ज्यांपैकी दहा टक्के मुलेही असू शकतील, असे राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी या पार्श्वभूमीवर राज्याच्या कृती गटातील तज्ज्ञांशी चर्चा केली. देशभरात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका सर्वाधिक महाराष्ट्राला बसला आहे.

यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, संसर्गाची नवी लाट महाराष्ट्रात येण्याची शक्यता असल्याने त्यातील संभाव्य परिस्थितीचे माहिती बैठकीत आरोग्य विभागाने केलेल्या सादरीकरणात मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला मर्यादित कसे ठेवायचे ते आपल्या हातात आहे. आपण गर्दीची ठिकाणे टाळली पाहिजेत आणि दोन मास्कचा वापर केला पाहिजे. जर आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर तिसरी लाट मोठी होईल, असे टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित म्हणाले.

यावेळी लसीकरण वाढवण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले. जेव्हा महामारीची पहिली लाट महाराष्ट्रात आली, तेव्हा राज्यात कोणतीही मूलभूत सुविधा नव्हती, परंतु त्यानंतरच्या काळात त्यामध्ये वाढ झाली. ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत कोरोनाच्या लसीचे ४२ कोटी डोस देशाला मिळतील आणि त्याचा फायदा राज्यालाही होईल याकडे त्यांनी लक्ष वेधले.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्यभर सिरो सर्वेक्षण करणे, मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे यावर भर देतानाच निर्बंधांचे पालन काटेकोरपणे होणे गरजेचे असल्याचे सांगितले. इंग्लडसहअन्य इतर काही देशांत पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे निर्बंध लावण्याची वेळ आली आहे, याकडेही कृती गटाने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. ही संभाव्य लाट रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

जरी कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी या पार्श्वभूमीवर राज्याच्या कृती गटातील तज्ज्ञांशी चर्चा केली. आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, डॉ रामास्वामी, डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ राहुल पंडित, डॉ तात्याराव लहाने आदी यावेळी उपस्थित होते.