मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत


रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जोरदार बसरणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. त्याचबरोबर प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत देखील कमालीची वाढ झाली आहे. काही काळ वरुण राजा विश्रांती घेतो आणि त्यानंतर पुन्हा बरसायला सुरुवात करतो. सद्यस्थितीत परिस्थिती पाहता काही भागांमध्ये पावसाने अल्प कालावधीसाठी विश्रांती घेतली आहे. पण, वातावरण मात्र पावसाकरिता पुरक असून आगामी काळात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

खाडी किनारलगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून समुद्राला देखील उधाण येत असल्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांना देखील त्याबाबतच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. आगामी आणखी चार दिवस जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात 5 जून रोजी मान्सूनचे आगमन झाले. पण, त्यानंतर 10 जूनपर्यंत पावसाचा पत्ता नव्हता, केवळ पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या. त्यानंतर 11 जूननंतर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढू लागला. पण, हा पाऊस सरींवर होता. अखेर 13 जूननंतर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत गेला. आज घडीला जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून सर्वत्र पाणीच पाणी अशी स्थिती आहे.

पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात अद्याप तरी मोठी दुर्घटना झालेली नाही. पण, राजापुरातील बाजारपेठेत पाणी शिरण्याची शक्यता पाहता त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी सामान सुरक्षित स्थळी हलवण्याला प्राधान्य दिले आहे. तर नागरिकांना देखील सतर्क करण्यात आले. रत्नागिरी तालुक्यातील काही ठिकाणी झाडे उन्मळून पडणे, रस्ता खचणे तसेच काही ठिकाणी घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे.

दापोली तालुक्यात पाचपंढरीमध्ये दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता दोन घरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तर, गुहागर तालुक्यात पालशेत येथे पूर आल्यामुळे बुधवारी संध्याकाळपर्यंत 12 गावांचा संपर्क तुटला होता. जिल्ह्यातील ग्रामीण भागात मात्र विजेचा लपंडाव सुरू असल्याचे चित्र आहे.

कोकणातील भातशेतीच्या कामांसाठी सध्याचा काळ असतो. याचवेळी भातीची पेरणी केली जाते. पण, मुसळधार पाऊस आणि त्याबाबत हवामान विभागाने केलेले आवाहन पाहता शेतकऱ्यांचे वेळापत्रक मात्र विस्कळीत झाले आहे.