देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत हळूहळू घट, तर 2330 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकडेवारीची गती काहीशी कमी झाली आहे. कोरोनाबाधितांची आकडेवारी सलग दहाव्या दिवशी एक लाखांहून कमी आली आहे. गेल्या 24 तासांत देशात 67,208 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे, तर 2330 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात एक लाख तीन हजार 570 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी मंगळवारी देशात 62 हजार 224 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती, तर दोन हजार 542 रुग्णांचा मृत्यू झाला होता. देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा 1.28 टक्के इतका आहे तर रिकव्हरी दर हा 96 टक्के इतका आहे.

महाराष्ट्रात काल दिवसभरात 10 हजार 107 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 10 हजार 567 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवारी 237 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात सध्या एकूण 1,36,661 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 21 जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही, तर 12 ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.94 टक्के एवढा आहे.