सीबीएसई बोर्डाचा दहावीचा २० जुलै, तर बारावीचा निकाल ३१ जुलैला लागणार !


नवी दिल्ली – २० जुलैला इयत्ता १० वी च्या बोर्डाच्या परिक्षेचा निकाल जाहीर करणार असल्याची घोषणा सीबीएसई बोर्डाने केली आहे. तर ३१ जुलै बारावीच्या परिक्षेचा निकाल रोजी लागणार आहे. सीबीएसईने बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठीचे सूत्र आजच जाहीर केले आहे. या सूत्रानुसार, बारावीच्या विद्यार्थ्यांना गुण दिले जातील.

सीबीएसई बोर्डाचे संयम भारद्वाज याबद्दल बोलताना म्हणाले की, दहावीचा निकाल २० जुलैला आणि बारावीचा निकाल ३१ जुलैला लावण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. जेणेकरुन ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी जायचे आहे, त्यांना काही अडचणी यायला नकोत. पुढे त्यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबद्दलही माहिती दिली.

बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सीबीएसई बोर्डाने आजच सर्वोच्च न्यायालयापुढे सादर केला. ४०: ३०: ३० या फॉर्म्युल्यानुसार आता बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणार आहे. मूल्यमापनाच्या या पद्धतीनुसार, यासाठी तीन प्रकारचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.

इयत्ता १०वी मध्ये विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर ३० टक्के मार्क देण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट गुण असलेल्या तीन विषयांचा समावेश करण्यात येईल. त्यानंतर ३० टक्के गुण असतील ते ११ वीच्या अंतिम परिक्षेत केलेल्या कामगिरीवर आधारित आणि उरलेले ४० टक्के गुण हे बारावी इयत्तेत घेतलेल्या चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा आणि प्रीलियम परीक्षा यांच्या गुणांच्या आधारावर देण्यात येतील.