ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन


मुंबई : 50 आणि 60 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेते चंद्रशेखर यांचे वयाच्या 98 व्या वर्षी मुंबईतील अंधेरी येथे राहत्या घरी 7.30 वाजता निधन झाले. त्यांना मागील बऱ्याच काळापासून आजारपणाने ग्रासले होते. त्यांनी 50 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली होती. पुढे त्यांनी चरित्रात्मक भूमिकांनाही न्याय दिला.

त्यांच्या निधनाची माहिती चंद्रशेखर यांचा नातू, विशाल शेखर यांनी दिली. त्यांना गेल्या काही दिवसांपूर्वी ताप आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्यानंतर त्यांना जुहू येथील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, त्यानंतर त्यांना घरीही आणण्यात आले होते. आपण अखेरच्या दिवसांमध्ये कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करावा अशीच आजोबांची इच्छा असल्याचे त्यांच्या नातवाने सांगितले.

ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून त्यांनी कलाविश्वात कारकिर्दीची सुरुवात केली, अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्यानंतर त्यांना मध्यवर्ती भूमिकांमध्ये साकारण्याची संधी मिळाली. हैदराबादमध्ये जन्मलेल्या चंद्रशेखर यांनी 1953 मध्ये व्ही. शांताराम यांच्या ‘सुरंग’ मध्ये पहिल्यांदाच मध्यवर्ती भूमिका साकारली होती. यानंतर त्यांनी ‘कवी’, ‘मस्ताना’, ‘बरादरी’, ‘काली टोपी लाल रुमाल’, ‘स्ट्रीट सिंगर’ या चित्रपटांतही भूमिका साकारल्या.

त्यांनी 60 आणि 70 च्या दशकात ‘कटी पतंग’, ‘हम तुम और वो’, ‘अजनबी’, ‘महबूबा’, ‘अलग-अलग’, ‘शक्ती’, ‘शराबी’, ‘डिस्को डांसर’, ‘नमक हलाल’, ‘द बर्निंग ट्रेन’ या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या. 1998 मध्ये दूरदर्शनवर प्रदर्शित रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत चंद्रशेखर यांनी आर्य सुमंत हे पात्र साकारले होते. त्यांनी साकारलेल्या या भूमिकेला कमालीची लोकप्रियता मिळाली होती.