सरकार संभाजीराजेंच्या मागण्यांबद्दल 100 टक्के सकारात्मक : सतेज पाटील


कोल्हापूर : कोल्हापूरचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात कोल्हापुरात मूक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे, या आंदोलनात आरक्षणाबाबत बोलताना संभाजीराजे छत्रपती यांच्या मागण्यांबद्दल सरकार 100 टक्के सकारात्मक असून सरकार एक पाऊल पुढे यायला तयार आहे. सरकार आणि संभाजीराजे यांनी चर्चा करुन मार्ग काढू. सरकार जबाबदारी घेण्यास कुठेही कमी पडणार नसल्याचे आश्वासन सतेज पाटील यांनी दिले आहे.

राज्यभरातील मराठा समन्वयक कोल्हापुरातील या मूक मोर्चात सहभागी झाले आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही आंदोलनाला हजर आहेत. तसेच कोल्हापुरातील मूक मोर्चाला आमदार, खासदारांनीही उपस्थिती लावली आहे. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी आपापले मनोगत व्यक्त करताना मराठा समाजाला आरक्षण मिळावे, हीच भूमिका मांडली.

सतेज पाटील म्हणाले की, सरकार संभाजीराजे छत्रपती यांच्या मागण्यांबद्दल 100 टक्के सकारात्मक असून सरकार एक पाऊल पुढे यायला तयार आहे. पुन्हा एकदा भेटून या प्रश्नी चर्चा करणे गरजेचे आहे. उद्याच्या उद्या संभाजीराजे यांना वेळ द्यायला सरकार तयार आहेत. सरकार आणि संभाजीराजे यांनी चर्चा करुन मार्ग काढू. हातात हात घालून आपण काम केले पाहिजे. सरकार जबाबदारी घेण्यास कुठेही कमी पडणार नाही.

आम्ही या आंदोलनात कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून सहभागी झालो आहोत. उच्च न्यायालयात टिकलेला कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकू शकला नाही. ज्या उद्दिष्टाने हे आंदोलन सुरु केले आहे, त्या उद्दिष्टापर्यंत जावे, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला. तसेच सरकारने काही केले नाही हे बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही. जे आधीचे वकील होते तेच मुद्दा मांडत होते, मात्र न्यायालयाचा निर्णय विरोधात आला, असा टोला सतेज पाटील यांनी भाजपला लगावला.

दोन वेळा मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन केले. पण आरक्षण न्यायालयात टिकले नाही. नारायण राणे यांची समिती नेमून आरक्षण देणे ही आमची चूक असल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. कायदा व्यवस्थित असता तर तो टिकला असता ना, असे म्हणत हसन मुश्रीफ यांनी भाजपवर निशाणाही साधला. तसेच सारथी, नियुक्ती पत्र असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कर्ज देणे असेल, हे सगळे प्रश्न आम्ही पूर्ण करणार आहोत. वाटेल ती किंमत मोजू, पण मराठा समाजाचे सगळे प्रश्न सोडवू, अशी ग्वाही देखील हसन मुश्रीफ यांनी दिली.

दरम्यान केंद्र सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटेल. पंतप्रधानांनी ठरवले तर काहीही होऊ शकते, अशी प्रतिक्रिया श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी वक्त केली. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात आपल्या विरोधात निकाल लागला आहे. आता त्याच ठिकाणाहून आपण सुरुवात केली पाहिजे. फेरविचार याचिकेत खूप वेळ जाईल, त्यातून काही निष्पन्न होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटू शकेल. नवीन कायदा आणल्याशिवाय आता काही होणार नाही. एवढ्या घटना दुरुस्त्या केल्या, मग आता का करत नाही हे समजत नाही. पंतप्रधान यांचे या मुद्द्यावर काय मत आहे हे समजले पाहिजे.