उद्या कोणीही बोलायचे नाही, माझ्यासह आपण सर्वांनी मौन राखायचे – छत्रपती संभाजीराजे


कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. रायगडवरील 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यानंतर मराठा आरक्षणावर संभाजीराजेंनी आपली भूमिका मांडली. कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून येत्या 16 जूनपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात होईल, असे संभाजीराजे म्हणाले होते. उद्यापासून कोल्हापुरातून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. हे आंदोलन शाहू समाधी स्थळी केले जाणार आहे. संभाजीराजे या आंदोलनाच्या तयारी पाहण्यासाठी आंदोलन स्थळी दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी उद्याच्या मूक आंदोलनात सहभागी होणाऱ्यांसोबत संवाद साधला. तसेच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टींचा आढावाही घेतला.

यावेळी बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, उद्याचे आंदोलन हे मूक आंदोलन आहे. अनेकांना वाटते हा मोर्चा आहे. पण मूक आंदोलनाचा अर्थच आहे. मूक मोर्चा आपल्याला काढायचा असता तर, आपण काढू शकलो असतो. पण मोर्चा काढण्याची ही परिस्थिती नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण पुन्हा लोकांना वेठीस का धरायचे? ज्या समाजाला आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत, त्यांनी आपल्या 58 मोर्चांच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. समाज बोलला आहे, आणखी त्याने रस्त्यावर का उतरायचे? समाजाने आतापर्यंत आपली भूमिका मांडली आहे, त्यामुळे आता लोकप्रतिनिधींनीही बोलले पाहिजे, अशी सर्वांची इच्छा आहे. सर्वच आमदार, खासदारांना आपण उद्याच्या आंदोलनासाठी निमंत्रित केले आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते सर्वजण येतील.

आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपणही सन्मानपूर्वक वागणूक द्यायची. कारण ते आपल्यासाठी येथे येणार आहेत. आपल्यापैकी कोणीही त्यांना उलट-सुलट प्रश्न विचारायचे नाहीत. उद्या कोणीही बोलायचे नाही. माझ्यासह आपण सर्वांनी मौन राखायचे आहे. आपण आंदोलनासाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधींना बोलू द्यायचे, त्यांचे मन मोकळे करु द्या. हवे तेवढा वेळ बोलू द्यात. पण त्यांनी येणे महत्त्वाचे आहे. मला विश्वास आहे ते सर्वजण येतील, असे खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल अनेकांनी संपर्क साधला. पोलिसांचाही समावेश होता. त्यांना आम्ही स्पष्ट केले आहे की, हे मूक आंदोलन आहे. राज्यभरातील समन्वयक येणार असल्यामुळे त्यांची व्यवस्था करणे ही सुदधा आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपल्याला कोणताही कायदा हातात घ्यायचा नाही. कोरोना नियमांचे पालन करुन सोशल डिस्टन्सिंग ठेवून, अंतर ठेवून शांतपणे आंदोलन करु. कोणताही गदारोळ न करता. उद्या कोणताही गदारोळ होणार नाही, ही सावधगिरी आपण सर्वांनी पाळली पाहिजे. मला पूर्ण विश्वास आहे की, कोल्हापूरकरांनी नेहमी एक दिशा दिली असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले.