उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री म्हणतात; कोरोना लस घेण्यास मुस्लीम समाजातील लोक करतात टाळाटाळ


ऋषिकेश – मुस्लीम समाजातील लोक कोरोना लसीकरण करुन घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे मत भाजपचे वरिष्ठ नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी व्यक्त केले आहे. मुस्लीम समाजामध्ये लसीकरणासंदर्भात अनेक गैरसमज असल्याचेही रावत यांनी म्हटले आहे. रावत यांनी सोमवारी एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना हे मत व्यक्त केले.

मी मुद्दाम नाव घेत आहे, पण सध्या लसीकरणापासून आपल्या देशातील मुस्लीम समाजातील लोक दूर राहत आहेत. अजूनही त्यांच्या मनामध्ये शंका आहे. अजूनही ते घाबरत आहेत आणि त्यांच्या मनात लसीकरणासंदर्भात गैरसमज असल्याचे रावत यांनी म्हटले आहे. ऋषिकेश येथे जागतिक रक्तदान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना रावत यांनी आपले मत मांडले. यावेळी सामाजिक संस्थांनी आणि प्रसारमाध्यमांनी मुस्लीम समाजामध्ये जनजागृती करुन लसीकरण हे धोकादायक नसल्याचा संदेश देण्यात मदत करावी असे आवाहनही रावत यांनी केले.

तुम्ही लस घेतली नाही तर हा कोरोना नष्ट होणार नाही. लस न घेतल्यास या कोरोनाचा संसर्ग होऊन एखादी व्यक्ती सुपर स्प्रेडर ठरु शकतो. सर्वांनी लसीकरण करुन घेण्यासाठी पुढे यावे, असे मी आवाहन करतो, असे रावत यांनी म्हटले आहे. देशातील ८० टक्के लोकांचं लसीकरण झाल्यानंतरच हर्ड इम्युनिटी निर्माण होईल, असेही रावत यांनी म्हटले आहे. लसीकरणासंदर्भातील विचित्र नियम पाकिस्तान सरकारने लागू केल्याचा उल्लेखही रावत यांनी केला. पाकिस्तान सरकारने फोन ब्लॉक करणे, वेतन रोखून धरणे यासारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून लसीकरणासाठी नागरिकांना भाग पाडले आहे. अशा निर्णयांमुळे लसीकरणासंदर्भात मोठ्याप्रमाणात जनजागृती निर्माण करता येते, असे रावत यांनी म्हटले आहे.

कोरोना कर्फ्युमध्ये उत्तराखंड सरकारने सोमवारी २२ जूनपर्यंत वाढ करण्यात येत असल्याची घोषणा केली. चारधाम यात्रेसाठी आरटीपीसीआर चाचणीचा निकाल नकारात्मक असणाऱ्यांना परवानगी देण्यात येईल, असेही सांगितले आहे. चामोली जिल्ह्यातील नागरिकांना बद्रीनाथ, तर रुद्रप्रयाग जिल्ह्यातील स्थानिकांना केदारनाथ आणि उत्तरकाशीमधील स्थानिकांना गंगोत्री तसेच यमुनोत्री देवस्थानांना भेट देण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती सरकारी प्रवक्ते सुबोध विनियाल यांनी दिली. २२ जूननंतर सरकार अनलॉकचा विचार करु शकते, असेही सुबोध यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची संख्या वाढल्यानंतर राज्यातील अनेक देवस्थाने सर्वसमान्यांसाठी बंद करण्यात आली होती. आता ती टप्प्याटप्प्यात पुन्हा सुरु केली जात आहेत.