राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी एका दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे; उदयनराजेंची मागणी


पुणे – भाजप खासदार छत्रपती उदयनराजे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्याने एका दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी केली आहे. पुण्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्यावर उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यात पुण्यात बैठक झाली. यानंतर राज्य सरकारवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उदयनराजे यांनी जोरदार टीका केली.

मराठा आऱक्षण ही राज्याची जबाबदारी आहे. हे सगळे आमदार, खासदार जर एवढे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असतील तर नेमकी समस्या काय आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार सोडून द्या सगळे…मी सगळ्यांबद्दलच विचारत आहे. तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा ना… त्याचे थेट प्रक्षेपण करा. पण सभागृहात गेल्यावर हे एक बोलतात आणि बाहेर आल्यावर दुसरे बोलतात, अशी टीका यावेळी त्यांनी केली.

उदयनराजेंना केद्राच्या भूमिकेसंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, तुमच्यात दम असेल तर अधिवेशन बोलवा. आधी राज्याने धाडस असेल तर अधिवेशन घेऊन दाखवावे नंतर मी केंद्राचे पाहतो, असेही ते म्हणाले आहेत. अधिवेशन बोलवून गायकवाड समितीच्या अहवालावर चर्चा करावी. आता न्यायाधीश भोसले यांचा अहवाल आला आहे. थप्पी गोळा करुन काय रद्दीत विकून त्यावर राज्य चालवणार का? काय फालतुगिरी सुरु आहे, असा संताप व्यक्त करताना उदयनराजेंनी त्यांना आधी अधिवेशन घेऊ द्या, मग रुपरेषा ठरवतो. मग एकेकाला कसे गाठायचे, ते मी बघतो असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

मुद्द्यांवर आधारित राजकारण केले तर लोक पाठिंबा देतील. मुद्दे घेतले जात नाहीत तर समाजाच्या आधारे राजकारण केले जात आहे. कारण नसताना एवढी मोठी दुफळी निर्माण केली आहे. माझा न्यायालयावर तर विश्वासच नसल्याचे उदयनराजेंनी यावेळी सांगितले. यावेळी संभाजीराजेंनी पुकारलेल्या मूक आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले. त्यांनी काय करावे हा त्यांचा मुद्दा आहे, शेवटी मराठा आरक्षण हेच ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आतापर्यंत राज्यकर्त्यांना फार मुभा दिली आहे. निवडून आल्यानंतर लोकशाहीतील हे जे राजे आहेत, त्यांनाही जाब विचारला पाहिजे. जेव्हा राजेशाही होती, तेव्हा असे नव्हते. लोकशाही अस्तित्वात आल्यानंतर ते राजे नीट वागत नसतील तर त्यांना आडवा आणि गाढले पाहिजे, असे ठाम मत आहे. त्यांना जाब विचारा आणि त्याची सुरुवात माझ्यापासून करा. प्रत्येक आमदार, खासदाराला विचारले पाहिजे. किती दिवस लोकांना संभ्रमावस्थेत ठेवणार आहात आणि हा अधिकार कोणी दिला, असा संतापही उदयनराजेंनी व्यक्त केला.

उदयनराजेंना भाजप नेत्यांच्या टीकेसंबंधी विचारण्यात आले असता त्यांनी म्हटले की, हाताची पाचही बोटे जशी सारखी नसतात, तसे प्रत्येकाचे वेगळे मत असते. माझी मूल्य वेगळी आहेत. मी जमिनीवर परिस्थिती पाहून चालणार माणूस आहे. मी कायदा वैगेरे मानत नाही. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी गायकवाड समितीचा अहवालच वाचलेला नाही, हा माझा आरोप नाही तर ठाम मत असल्याचेही म्हटले. आरक्षणामध्ये पक्ष आणू नका. जे मी बोलत आहे ते सर्वांना लागू होते. काँग्रेस, भाजप, आरपीआय, जनता दल वैगेरे…मग सरकार किंवा लोकप्रतिनिधी कोणतेही असो. पण येथे समाजाचा प्रश्न असल्याचेही ते म्हणाले.