अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या जमीन खरेदीत मोठा घोटाळा; आम आदमी पक्षाचा आरोप


अयोध्या : अयोध्येत राम मंदिराचे निर्माण करणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. संस्थेचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या मदतीने ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी दोन कोटी रुपये दराची जमीन 18 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली. त्यांनी सांगितले की, हे थेट पैशांच्या अफरातफरीचे प्रकरण आहे आणि याची सरकारने सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी करावी.


तर दुसरीकडे समाजवादी पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले आणि अयोध्याचे माजी आमदार पवन पांडे यांनीही चंपत राय यांच्यावर असेच आरोप करत सीबीआय तपास करण्याची मागणी केली आहे. चंपत राय यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, अशाप्रकारच्या आरोपांना मी घाबरत नाही. माझ्यावर झालेले आरोप मी तपासणार आहे.

काही दस्तऐवज सादर करत संजय सिंह यांनी म्हटले की, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या नावावर भ्रष्टाचार आणि घोटाळा करण्याची हिंमत करु शकेल, याची कोणी कल्पनाही करु शकत नाही. चंपतराय यांनी राम जन्मभूमी ट्रस्टच्या नावावर कोट्यावधी रुपये लंपास केले. सुलतान अन्सारी आणि रवी मोहन तिवारी या दोन व्यक्तींनी अयोध्या तहसीलमध्ये येणाऱ्या बागा बिजैसी गावातील पाच कोटी 80 लाख रुपये किंमतीची जमीन कुसुम पाठक आणि हरीश पाठक यांच्याकडून 18 मार्च रोजी दोन कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा दावा संजय सिंह यांनी केला.

आपचे खासदार संजय सिंह म्हणाले की, राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा आणि अयोध्याचे महापौर ऋषिकेश उपाध्याय संध्याकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी झालेल्या या जमीन व्यवहाराचे साक्षीदार बनले होते. पण त्यानंतर पाचच मिनिटांनी चंपतराय यांनी हिच जमीन सुलतान अन्सारी आणि रवी मोहन तिवारी यांच्याकडून साडे अठरा कोटी रुपयांमध्ये खरेदी केली. त्यापैकी 17 कोटी रुपये आरटीजीएसद्वारे देण्यात आले.

संजय सिंह यांनी आरोप केला की, दोन कोटी रुपयांमध्ये खरेदी केलेल्या जमिनीचा भाव प्रतिसेकंद जवळपास साडेपाच लाख रुपयांनी वाढला. भारतच काय जगात कुठेही कोणाच्या जमिनीचा भाव एवढ्या वेगाने वाढत नाही. विशेष म्हणजे पहिल्या जमीन व्यवहाराचे राम मंदिर ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा आणि अयोध्याचे महापौर ऋषिकेश उपाध्याय साक्षीदार बनले होते, तेच दोघे ही जमीन ट्रस्टच्या नावावर खरेदी करण्याच्या व्यवहारातही साक्षीदार होते. हे थेट पैशांच्या अफरातफरीचे आणि भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारकडे मागणी करतो की, तत्काळ ईडी आणि सीबीआयद्वारे याचा तपास करुन यामध्ये सामील भ्रष्टाचारी लोकांना जेलमध्ये टाकावे. कारण हा देशातील कोट्यावधी रामभक्तांच्या श्रद्धेसोबतच इतर नागरिकांच्या विश्वासाचाही प्रश्न आहे, ज्यांनी आपल्या कमाईतील काही रक्कम राम मंदिराच्या निर्माणासाठी दिले आहेत.

पुढे ते म्हणाले की, या प्रकरणात अॅग्रीमेंटचा स्टॅम्प आणि अॅनॉनिमस स्टॅम्पवरही प्रश्न उपस्थित करतात. जी जमीन नंतर ट्रस्टला विकण्यात आली, त्यावरील स्टॅम्प पाच वाजून 11 मिनिटांनी खरेदी करण्यात आली. तर जी जमीन पहिल्यांदा रवी मोहन तिवारी आणि सुलतान अन्सारी यांनी खरेदी केली, त्यावरील स्टॅम्प पाच वाजून 22 मिनिटांचा आहे.


दरम्यान काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करत आरोप केल आहे की, हे राम, हे कसले दिवस… तुमच्या नावावर देणगी गोळा करुन घोटाळा होत आहे. बेशर्म लुटारु आता श्रद्धा विकत, ‘रावण’प्रमाणे अहंकारात आहेत. प्रश्न आहे की, दोन कोटीमध्ये खरेदी केलेली जमीन 10 मिनिटांनी ‘राम जन्मभूमी’ला 18.50 कोटी रुपयांत कशी विकली? आता तर असे वाटते … हे कंसांचेच राज्य आहे, चहूबाजूने रावण आहे.

ट्रस्टच्या प्रमुखांनी समोर येऊन या प्रकरणी स्पष्टीकरण द्यायला हवे. या प्रकरणी केंद्र तसेच राज्य सरकारने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनीही खुलासा करणे गरजेचे आहे. अयोध्येतील मंदिरासाठी ज्यांनी लढा दिला आहे, त्यांना कळणे गरजेचे आहे की, नक्की तिथे काय घडत आहे. राम मंदिराच्या निर्माणासाठी संपूर्ण जगातून श्रद्धेपोटी शेकडो कोटींचा निधी दिला आहे. राम मंदिराच्या नावावर सामान्यांकडून देणगी घेण्यात आली आहे. श्रद्धेतून गोळा झालेल्या निधीचा गैरवापर होत असेल तर त्या श्रद्धेला काहीच अर्थ उरत नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.