हिंदीच्या ‘ठग’ या शब्दापासून इंग्रजी भाषेतील ‘Thug’ हा शब्द आला आहे. या शब्दाचा अर्थ आज बदलला असून दगाबाज, भामटा, चलाख अशा लोकांना आज ‘ठग’ म्हणतात. पण खूप वर्षांपूर्वी ‘ठग’ हा शब्द वेशांतर करून लोकांची लूट आणि हत्या करणाऱ्यांसाठी वापरला जात होता.
असाच एक बहराम नावाचा ठग होता. कदाचित तो जगातील सगळ्यात मोठा ठग असेल. त्याच्यावर ९३१जणांची हत्या केल्याचा आरोप होता. हत्या करण्याची त्याची पद्धतही इतरांपेक्षा वेगळी होती. तो १८४०मध्ये इंग्रजांच्या तावडीत सापडला. त्याला वयाच्या ७५व्या फाशी देण्यात आली होती.
१७६५मध्ये बहरामचा जन्म झाला होता. ९३१जणांची हत्या त्याने केली होती. यातील १२५जणांना त्याने स्वत: यमसदनी पाठविले होते. तर इतरांच्या हत्या साथीदारांच्या मदतीने केल्या होत्या. ठग बहरामच्या टोळीत २००पेक्षा अधिक सदस्य होते. ते आपसांत बोलण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या ‘रामोस’ या सांकेतिक भाषेचा वापर करायचे. बहराम आणि त्याची टोळी प्रामुख्याने हल्ला करताना ‘रामोस’ भाषा वापरत होते.
इतरांपेक्षा वेगळी अशी बहरामची हल्ला करण्याची पद्धत होती. टोळीतील सदस्य यात्रेकरूंच्या समुहाचा पाठलाग करत होते. रात्री यात्रेकरू झोपल्यानंतर पाठलाग करणारे सदस्य लांडग्याचा आवाज काढून साथीदारांना बोलवत होते. बहराम नाणे बांधलेल्या रूमालाने गळा आवळून लोकांची हत्या करायचा. बहरामची टोळी व्यापारी, पर्यटक आणि यात्रेकरूंवर हल्ला करायची. त्यानंतर त्यांची अशी विल्हेवाट लावायचे की त्यांचा थांगपत्ताच लागत नव्हता. ब्रिटीश सरकारने १८०९ मध्ये बेपत्ता होणाऱ्या लोकांबाबत चौकशी करण्यासाठी वेगळा विभाग स्थापन केला होता. यामागे बहराम असल्याचे कॅप्टन स्लीमॅन यांना चौकशी दरम्यान माहीत झाले. ठग बहरामची दिल्ली ते जबलपूर मार्गावर दहशत होती. त्याला पकडण्यासाठी या संपूर्ण रस्त्यावरील झाडे कॅप्टन स्लीमॅनने तोडली होती आणि गुप्तचरांचे एक मोठे जाळे पसरवले होते. ठग बहरामला पकडल्यानंतर त्याच्या बाकीच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली. ब्रिटीश सरकारने त्यांनाही फाशीची शिक्षा दिली.