भाजपच्या आणखी एका खासदारासह तीन आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या तयारीत?


कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर घरवापसीचे वारे वाहताना दिसत आहे. निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले काही आमदार आणि नेते पुन्हा तृणमूल काँग्रेसचे दार ठोठावू लागले आहेत. भाजप नेते मुकुल रॉय यांनी शुक्रवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे. त्याचबरोबर यामुळे भाजपला मोठे हादरे बसण्याची शक्यता आहे. एका खासदारासह तीन आमदारांनी बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी बोलवलेल्या बैठकीकडे पाठ फिरवल्यामुळे चार जण तृणमूलच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. तृणमूल पुन्हा सत्तेत आल्यामुळे निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेले नेते परतीची पावले टाकताना दिसत आहे. पूर्वाश्रमीचे तृणमूलचे नेते मुकुल रॉय हे भाजप गेले होते. त्यांनी चार वर्षांनंतर भाजपला सोडचिठ्ठी देत पुन्हा ममतांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश केला. हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, पश्चिम बंगाल भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी पक्षाची बैठक बोलावली होती. या बैठकीला एका खासदारासह तीन आमदारांनी दांडी मारल्यामुळे हे चौघे भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेला दुजोरा मिळत असल्याचे म्हटले जात आहे. शुक्रवारी दिलीष घोष यांनी बोलावलेल्या बैठकीला भाजप खासदार शांतनु ठाकूर आणि अन्य तीन आमदार गैरहजर होते. हा सर्व प्रकार मुकुल रॉय यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला, त्याच दिवशी घडला.

खासदार शांतनु ठाकूर भाजपवर सीएए कायदा लागू करण्यावरून नाराज असल्याचे समोर आले होते. ठाकूर बंगालच्या राजकारणात महत्त्वाच्या असलेल्या मतुआ समुदायातून येतात. तर विश्वजित दास, अशोक कीर्तनिया आणि सुब्रत ठाकूर हे तीन आमदार बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याबद्दलही चर्चा होत आहे. निवडणुकीचे निकाल लागल्यापासून भाजपमधील कार्यकर्ते मुंबईत दाखल होत असल्यामुळे भाजपची चिंता वाढण्याची शक्यता आहे.