शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव


कोल्हापूर : राज्यातील 21 जिल्ह्यांतील कोरोना पॉझिटिव्ह दर हा पाच टक्क्यांहून कमी असतानाच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांतील परिस्थिती चिंताजनक असून कोल्हापुरचा कोरोना पॉझिटिव्ह दर हा 11 टक्के, सांगलीचा 10 टक्के तर साताऱ्याचा 9.75 टक्के आहे. कोल्हापुरात गेल्या दीड महिन्यांपासून कोरोनाबाधितांची रोजची आकडेवारी ही 1500 ते 2200 ने वाढत आहे.

कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. यासाठी निर्बंधांचे पालन करण्याऐवजी नागरिकांकडून करण्यात येणारा हलगर्जीपणा हा अधिक जबाबदार असल्याचे दिसून येत असल्यामुळे आता ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

सध्या चौथ्या स्तरामध्ये कोल्हापूर जिल्हा हा असला तरी निर्बंधामध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. त्यामुळे हा दर पुन्हा वाढतो की काय अशी भीती अनेकांनी व्यक्त केली आहे. कोल्हापुरात शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला असून या दरम्यान नागरिकांना बाहेर पडू नयेत, अशा प्रकारच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

आता शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव चिंताजनक असून काही ठिकाणी गावच्या-गाव कोरोनाबाधित झाल्याचे चित्र दिसून आले आहे. या ठिकाणची परिस्थिती पाहून राज्याच्या टास्क फोर्सनेही या ठिकाणी भेट दिली असून काही आवश्यक त्या सूचनाही केल्या आहेत.

कोल्हापुरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन नागरिकांनी स्वत:हून काही निर्बंध पाळावेत, अशा प्रकारचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. लॉकडाऊनच्या निर्बंधाचे शनिवारी आणि रविवारी कडक पालन व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर पोलिसांची नियुक्ती केली आहे.