मराठा आरक्षणाच्या आंदोलनात नक्षलवाद्यांची उडी; मराठ्यांनो दलाल नेत्यांपासून सावध राहा


गडचिरोली : आता नक्षलवादी संघटनेने मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनात उडी घेतली आहे. मराठा तरुणांनो दलाल नेत्यांपासून सावध राहा, या आशयाची पत्रकबाजी गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून केली जात आहे. आमच्यामध्ये सामील व्हा, असे आवाहनही या पत्रकाच्या माध्यमातून नक्षलवाद्यांनी मराठा तरुणांना केले आहे.

केवळ अंबानी-अदानीचे हे सरकार असल्यामुळे आरक्षण सोडून व्यवस्था बदलासाठी तयार राहा, असे नक्षलवाद्यांनी म्हटले आहे. नक्षलवाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य निर्मितीची आठवण करुन देत मराठा तरुणांना भावनिकदृष्ट्या आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. नक्षलवादी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याआड नवा डाव रचत आहेत. नक्षलवादी या आंदोलनाचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नात आहेत.

नक्षलवाद्यांच्या पत्रकात असे म्हटले आहे की, जे मराठा समाजातून मूठभर दलाल भांडवलदार निर्माण झाले आहेत, तेच खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या अधोगतीला जबाबदार आहेत. या अधोगतीचे स्वरुप सामाजिक नसून आर्थिक आहे. सरकारांचे आजवरचे धोरणे या आर्थिक अधोगतीला कारणीभूत आहेत. तेव्हा आपले खरे शत्रू मराठा समाजाने ओळखले पाहिजे.

मराठा समाजाने शिवबांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये पुढाकार घेतला होता, आता पुन्हा एकदा पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मावळे बनावे लागेल. परत एकदा गनिमी काव्याचे डावपेच वापरावे लागतील. शत्रू, व्यवस्थेचे रखवालदार, साम्राज्यवादाचे दलाल सत्ताधारी वर्ग आहेत. मित्र, सर्वच समाजातील गोरगरीब जनता आहे. माओवादी मैदानात शस्त्र उचलून लढत आहेत. लक्ष्य, मार्ग, साधने तयार आहेत. मराठा समाजातील शिवाजी महाराजांचा खरा आदर्श बाळगणाऱ्या मावळ्यांना आवाहन आहे की, रयतेचे खरे राज्य आणण्यासाठी त्यांनी मैदानात उतरावे. आपल्या संघटित शक्तीला क्रांतीकडे वळवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमची वाट पाहत असल्याचेही नक्षली संघटनेने या पत्रकात म्हटले आहे.