यंदाही पायी वारी सोहळा नाही; पण महत्त्वाच्या 10 पालख्यांनाच परवानगी : अजित पवार


पुणे : आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पंढरपूरच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासंदर्भातील नियमावली उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली. पुण्यातील बैठकीत यावेळी आषाढी वारीबाबत चर्चा झाली असून 10 महत्त्वाच्या पालख्यांना वारीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच देहू, आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी देण्यात येणार असून उर्वरित 8 पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 50 वारकऱ्यांना वारीची मुभा देण्यात येणार असल्याचे सांगितले.

अजित पवार बोलताना म्हणाले की, वारकरी संप्रदायाने आषाढीच्या पायी वारीसाठी मागणी केली होती. वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवरांसोबत बैठक पार पडली होती. त्या बैठकीत अनेकांनी पायी वारीसाठी आग्रही मागणी केली होती. अशातच मंत्रिमंडळाची काल (गुरुवारी) बैठक पार पडली. आषाढी वारी पालखी सोहळ्यातील 10 मानाच्या प्रमुख पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या 10 मानाच्या पालख्यांना 20 बसच्या माध्यमातून पंढरपुरात जाता येणार आहे.

कोरोनाच्या सावटातच यंदाचा आषाढी वारी सोहळाही पार पडणार आहे. 10 मानाच्या पालख्यांना पंढरपुरच्या आषाढी वारीसाठी परवानगी देण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी बोलताना सांगितले. या 10 मानाच्या पालख्यांना 20 बस पंढरपुरात जाण्यासाठी दिल्या जातील. तसेच देहू, आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी देण्यात येणार असून उर्वरित 8 पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 50 वारकऱ्यांनाच वारीची मुभा देण्यात येणार असल्याचेही अजित पवारांनी सांगितले.

गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विठुरायाचे मंदीर भाविकांसाठी बंदच असणार आहे. तसेच सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पालखी सोहळ्यात सहभागी होणार सर्व वारकऱ्यांना वैद्यकीय चाचणी करणे आवश्यक असल्याचेही अजित पवार म्हणाले. शासकीय महापूजेचा कार्यक्रम गेल्या वर्षीप्रमाणे सर्व निर्बंध पाळूनच करण्यात येईल, असेही पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

या 10 मानाच्या पालख्यांना देण्यात आली परवानगी

  • संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर)
  • संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)
  • संत सोपान काका महाराज (सासवड)
  • संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)
  • संत तुकाराम महाराज (देहू)
  • संत नामदेव महाराज (पंढरपूर)
  • संत एकनाथ महाराज (पैठण)
  • रुक्मिणी माता (कौडानेपूर -अमरावती)
  • संत निळोबाराय (पिंपळनेर – पारनेर अहमदनगर)
  • संत चांगटेश्वर महाराज (सासवड)

दरम्यान, आषाढी वारी कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी निर्बंधांमध्ये करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. बस आणि भाविकांची संख्या दुप्पट करीत वारकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा बसमधून पालखी सोहळे आणावे लागणार असून यंदा फक्त 10 पालख्यांना 20 बस दिल्या जाणार आहेत. भाविकांची संख्या देखील दुप्पट करीत वारकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे. याशिवाय विसाव्यापाशी होणारे प्रतिकत्मक रिंगण करून दिड किलोमीटर पायी चालत येण्यास निर्बंध घालून परवानगी दिली आहे.