चंद्रकांत पाटलांचा संभाजीराजेंना इशारा वजा सल्ला


पुणे – छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यात बोलताना आंदोलनाची तलवार उपसली. मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरात आंदोलन करण्याची घोषणा संभाजीराजेंनी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंच्या भूमिकेवर बोलताना त्यांना महाराष्ट्र सरकारबद्दल सावधगिरीचा इशारा दिला आहे. संभाजीराजे यांनी चालढकल केली, तर भाजप मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी पुढाकार घेईल, त्याच्या पाठिशी उभी राहील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शुक्रवारी माध्यमांशी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला. त्यांना यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर घेतलेल्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. पाटील त्यावर बोलताना म्हणाले, मराठा मोर्चा काढण्यात चालढकल झाली, तर ती बाब ध्यानात येण्याइतपत मराठा समाज सुज्ञ आहे. असे झाले तर मराठा आंदोलनाचे नेतृत्व दुसऱ्या कुणाकडे तरी जाईल किंवा काय होईल, ते माहिती नाही. पण, वेळ निघून गेल्यास मराठा समाजाचे मोठे नुकसान होईल. छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेमुळे सरकारला आरक्षणाच्या प्रश्नापासून पळवाट काढण्याची संधी, तर मिळणार नाही ना, याचा विचार संभाजीराजे यांनी केला पाहिजे, असा इशारा वजा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंना दिला आहे.

छत्रपती संभाजीराजे पुन्हा एकदा मोर्चा काढणार, एकदा लाँग मार्च काढणार असे सांगतात. १६ जून रोजी कोल्हापुरातही मराठा मोर्चा निघणार का, याची अद्याप शाश्वती नाही. या सर्व गोष्टी माध्यमांनी मराठा समाजासमोर नीटपणे मांडल्या पाहिजेत. रायगडावरुन मराठा मोर्चा काढण्याची घोषणा संभाजीराजे यांनी केल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला मी त्यांना पाठिंबा जाहीर केला. आता त्यांनी माघार घेतली तरी भाजपच्या भूमिकेत फरक पडणार नाही. पण उद्या कोल्हापुरात दुसरे कुणी पुढाकार घेऊन मोर्चा काढला, तर भाजपा त्यांनाही पाठिंबा देईल, असे चंद्रकांत पाटील स्पष्ट केले.

धार्मिक गोष्टींना महाविकासआघाडी सरकार विरोध करते, बाकी सगळ्याला परवानगी देते. शरद पवार यांनाही आजारपणाच्या काळात हॉटेल मालकांची काळजी होती. पण, आषाढीच्या पायी वारीसाठी वारकऱ्यांना परवानगी मिळालीच पाहिजे, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना केली.