मराठा आरक्षण : आता समाज नाही, तर आमदार, खासदार आणि मंत्री बोलतील – संभाजीराजे


कोल्हापूर – खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली असून आता समाज नाही, तर आमदार, खासदार आणि मंत्री बोलतील असे म्हणत त्यांनी मूक आंदोलन छेडले आहे. कोल्हापुरातून १६ जूनपासून या आंदोलनाची सुरुवात होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयापर्यंत लाँगमार्चचा इशाराही त्यांनी कोल्हापूरमध्ये झालेल्या मराठा समन्वयकांच्या बैठकीत दिला आहे.

त्यांनी यावेळी मूक आंदोलन छेडत असल्याची माहिती दिली. कोल्हापूरातील शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून १६ जून रोजी होणारे हे आंदोलन सुरु होईल. हे आंदोलन राज्याच्या ३६ जिल्ह्यांमध्ये करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, आत्तापर्यंत समाज खूप बोलला पण आता आपण बोलायचे नाही. आता आमदार, खासदार, मंत्री बोलतील. आता मराठा समाजाच्या आरक्षणाची जबाबदारी आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी घेतली पाहिजे.

मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुण्यातून मंत्रालयापर्यंत लाँग मार्च काढणार असल्याचा इशाराही संभाजीराजेंनी दिला आहे. खासदार संभाजीराजे आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. आपण कोणत्याही पक्षासाठी नाही तर समाजासाठी आक्रमक भूमिका घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण आता आक्रमक झालो असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी राजकारण्यांवरही संभाजीराजेंनी घणाघाती टीका केली आहे. राजकारणी आपली व्होट बँक खराब होईल म्हणून मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घेत नाही. पण मला ती काळजी नाही. आता आपण आक्रमक होणार असल्याचे संभाजीराजेंनी स्पष्ट केले आहे. समाजाची मी दिशाभूल करणार नाही. आता आपण डोके लावून भूमिका घ्यायची असल्याचेही ते म्हणाले.