नालेसफाईत महापालिकेचा ५ वर्षांत १००० कोटींचा घोटाळा, आशिष शेलारांचा गंभीर आरोप!


मुंबई – मुंबईची बुधवारी पहिल्या पावसातच अनेक भागात तुंबई झाल्याचे चित्र दिसून आले. अनेक भागात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले. या पार्श्वभूमीवर मुंबईची पुन्हा एकदा तुंबई होण्याला जबाबदार कोण? यावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून मुंबई महानगर पालिकेवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.

पहिल्या पावसातच कटकमिशनचे सगळे व्यवहार उघडे! मुंबईकर हो! सत्ताधीशांचा हा वसुलीचा नाद खुळा, नेमेचि येतो पावसाळा, पाच वर्षांत १ हजार कोटींचा घोटाळा! असे ट्वीट करत आशिष शेलार यांनी मुंबई महानगर पालिकेच्या कारभारावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, आशिष शेलार यांनी या ट्वीटसोबत पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये मुंबईत ५ वर्षांत १ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. पहिल्या पावसामध्ये पुन्हा मुंबई तुंबली. दुर्दैवाने मुंबईकरांचा जीव टांगणीला लागला. महानगरपालिकेचा १०४ टक्के किंवा १०७ टक्के नालेसफाईचा दावा फोल ठरला. पालिका प्रशासनाने काम केले नाही. कंत्राटदाराने पळ काढला. कंत्राटदारांच्या कृत्यांवर सत्ताधाऱ्यांनी पांघरूण घातले. दरवर्षाला नालेसफाईवर ७० ते १०० कोटी रुपये मुंबईत खर्च होतात. ५ वर्षांत ५०० कोटी रुपये, ते सोडून छोटे नाले, स्टॉर्म वॉटर ड्रेन, दुरुस्ती वा अन्य कामांसाठीचे दरवर्षाला १०० कोटींप्रमाणे असे ५ वर्षाला ५०० कोटी. म्हणजे ५ वर्षांत १ हजार कोटींचा खर्च करूनही मुंबईकरांच्या नशिबी तुंबलेले पाणी घरात घुसण्याची वेळ आल्याचे आशिष शेलार म्हणाले आहेत.

दरम्यान, मुंबईतील ज्या भागांत याआधी कधी पाणी साचत नव्हते, त्याठिकाणीही आता पाणी साचले असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे. स्टॉर्म वॉटर ड्रेनमध्ये मलब्याच्या गोण्या पडल्या आहेत. एकीकडे नागरिकांना मलब्याच्या गोण्या आणि दुसरीकडे मलईच्या गोण्या कंत्राटदाराकडे हे विदारक चित्र मुंबईकरांसमोर येत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. जिथे पाणी तुंबत नाही, त्या ठिकाणी देखील पाणी तुंबले असल्याचे आशिष शेलार म्हणाले आहेत. आता तरी मुंबईकरांची काळजी घ्या, असे आवाहन देखील ट्वीटमधून त्यांनी सत्ताधाऱ्यांना केले आहे.