नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवरुन उदयनराजेंनी साधला निशाणा


सातारा – आज (मंगळवार) सकाळी शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या मुद्यासह राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे देखील यावेळी उपस्थित होते. तसेच, पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वैयक्तिक भेट घेतल्याचेही समोर आले आहे. यावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी निशाणा साधला आहे.

उदयनराजे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी अधिवेशन बोलवायला हवे होते. त्यामध्ये चर्चा करायला हवी होती. चर्चा घडवून आणायला पाहिजे होती. मग त्यांना तुम्ही कधीही भेटा. आता हे भेटून त्यांना काय सांगणार? म्हणजे राजकीय तडजोड, ठीक आहे आम्ही हे करतो पण असे असे.. आपण एकत्र येऊया म्हणजे परत सत्तांतर होणार, म्हणजे काय? देवाण-घेवाणच होणार ना? काहीतरी असेच होणार असे मला वाटत आहे, हो की नाही?

आता एवढे सगळे चालले प्रकरण संपूर्ण राज्यात कोणीतरी कोणत्यातरी मजल्यावरून पडते, कोणाच्या गाडीत काय सापडत आहे, कुठेतरी काहीतरी होत आहे म्हणजे कुठेतरी काहीतरी घडत आहे हे सगळे सर्वांना माहिती आहे ना… मग त्यामध्ये भेटून काय होणार असते, तर काय होणार तुम्ही आम्ही एकत्र येऊया आपले लग्न परत लावूया आणि समाजाला शांत करूया. म्हणजे काय एकतर मुस्लिमांना पुरा आणि हिंदूंना जाळा एवढेच आता बाकी राहिले आहे. या आरक्षणामुळे एवढी आग लोकांच्या मनात पेटलेली आहे. काय बोलणार? असेही यावेळी उदयनराजेंनी बोलून दाखवले.

उदयनराजे भोसले यांनी सातारा येथील शासकीय विश्रामगृह येथे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली होती. या बैठकीनंतर उदयनराजे भोसले यांना उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान यांच्या भेटीबाबत विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.