हे आहे देशातील पहिले वहिले सोलर गाव


भोपाळ : सूर्यप्रकाशाची उपलब्धता मुबलक प्रमाणात असूनही सौरऊर्जेचा आपल्याकडे फार कमी उपयोग केला जातो. पण वीजेपासून जेवणापर्यंत सर्व काम सौरऊर्जेचा वापर करुनच मध्यप्रदेशातील बांचा गावात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच बांचा हे देशातील पहिले संपूर्णपणे सौरऊर्जेचा वापर करणारे गाव बनले आहे.

देशातील अनेक ठिकाणी वीजेचा अनियमित पुरवठा केला जातो. यामुळे सध्या सर्वांना वीजेच्या भारनियमनचा फटका बसत आहे. काही वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील बांचा गावात अशाच प्रकारची समस्या होती. बांचा गावातील गावकऱ्यांनी वीजेच्या नियमित पुरवठ्यासाठी गावात सौरऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकार आणि मुंबई आयआयटीच्या एकत्रित सौरऊर्जा प्रकल्पद्वारे या गावातील जवळपास 74 घरांजवळ सोलार पॅनल बसवण्यात आले. लोकांना या सोलार पॅनलचा उपयोग कसा करायचे हेही समजून सांगण्यात आले. त्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये संपूर्ण गावात सौरऊर्जा प्रकल्प राबवण्यात आला.

गावात आता या प्रकल्पामुळे सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती करण्यात येते. या गावात आता इडंक्शनवर जेवण बनवण्यापासून घरातील वीजेपर्यंतची सर्व काम सौरऊर्जेद्वारे केली जातात. त्यामुळे देशातील हे पहिले सौरऊर्जेवर चालणारे गाव ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी या गावाच्या प्रकल्पाचे मॉडेल तयार केले आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांना सौरऊर्जेद्वारे चालणाऱ्या इलेक्ट्रीक चुलीसाठी प्रत्येकी 80 हजार रुपये खर्च आला. पण इलेक्ट्रीक चूल गावात बसवण्याचा निर्णय त्यानंतर अनेकांनी घेतला. त्यामुळे आता केवळ 35 ते 40 हजार रुपये खर्च प्रत्येक चुलीमागे आल्याचे या प्रकल्पाचे मॅनेजर पवन कुमार यांनी सांगितले. पाच लोकांसाठी या चुलीद्वारे तीन वेळा जेवण, चहा, नाश्ता सर्व काही बनवता येते असल्याचे त्यांनी सांगितले.

सौरऊर्जा प्रकल्प गावात राबवल्यामुळे गावकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाल्यामुळे आता गावात कोणालाही चूलीसाठी लाकडे जमा करावी लागत नाही. त्यामुळे जंगलात झांडाची होणारी कत्तल थांबली आहे, असे मत गावातील गावकऱ्यांनी व्यक्त केले. सोलार चूलीमुळे भांडी काळी पडत नाहीत. त्यामुळे आमचा भांडी घासण्याचे श्रम आणि वेळ दोन्ही वाचतो. तसेच चूलीमुळे डोळ्यात धूर जातो. त्यामुळे डोळ्यांना त्रास होतो. मात्र सोलार चूलीमुळे कोणत्याही प्रकारचा धूर निर्माण होत नाही. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य नीट राहते, असे मत या गावातील महिलांनी व्यक्त केले.

Leave a Comment