वर्षभरात कोरोना प्रतिबंधक लस तयार करुन देश झाला आत्मनिर्भर – नरेंद्र मोदी


नवी दिल्ली – देशातील वैज्ञानिक आणि संशोधकांच्या कामगिरीमुळे देश प्रत्येक क्षेत्रात पुढे असून देश वर्षभरात कोरोना प्रतिबंधक लस तयार करुन आत्मनिर्भर झाल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी CSIR(Council of Scientific and Industrial research)च्या आज झालेल्या बैठकीत व्यक्त केली. त्यांनी यावेळी वैज्ञानिक आणि संशोधकांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात दिलेल्या योगदानाविषयी त्यांचे कौतुक केले.

वर्षभरातच देशाने कोरोना प्रतिबंधक लस तयार केली आणि जगाला दिली. हे वैज्ञानिकांच्या परिश्रमाचं फळ असल्याचेही मोदी म्हणाले. आता CSIRने समाजाशी संवाद साधून, त्यांच्या सल्ल्यांचा विचार करुन काम करायला सुरुवात केली आहे.

ते यावेळी बोलताना म्हणाले, लोकांना CSIRबद्दल माहिती मिळायला हवी. आपल्या देशातील वैज्ञानिक, संशोधक कशासंदर्भातील काम करत आहेत, हे त्यांना सोप्या भाषेमध्ये कळायला हवे. त्यामुळे तशी माहिती उपलब्ध करुन देण्याचा सल्ला मी देत आहे.

आता सगळ्याच क्षेत्रामध्ये आपला देश पुढे जात आहे. आपल्याला आता योग्य नियोजन करुन आणि निश्चित दिशेने देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सध्या आपल्या प्रगतीचा वेग कोरोनामुळे मंदावला असला तरीही आत्मनिर्भर भारत हाच आपला संकल्प आहे. वैज्ञानिकांची कोरोनाकाळात परिश्रम करुन आत्मनिर्भर होण्याची भूमिका ज्याप्रमाणे आहे, तशीच भूमिका आपल्याला प्रत्येक क्षेत्रात घ्यायची असल्याचेही ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी सर्व वैज्ञानिक आणि संशोधकांचे आभारही मानले.