…तर ती धमक योग्य वेळी दाखवू; संभाजीराजेंचा नारायण राणेंना सूचक इशारा!


रायगड – सध्या राज्यातील राजकीय वातावरण मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून चांगलेच तापल्याचे दिसत आहे. या मुद्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर, दुसरीकडे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेत, राज्य सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे. राज्यभर दौरा करून ते अनेक नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. या पाठोपाठच अनेक संघटना देखील आता आक्रमक होताना दिसत आहेत. दरम्यान, संभाजीराजेंवर या मुद्यावरून भाजप नेते नारायण राणे यांनी टिप्पणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आता संभाजीराजेंनी ट्विटद्वारे सूचक इशारा दिल्याचे दिसत आहे.

छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे आणि ताकदच पहायची असेल, तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

तर, काल नारायण राणे यांनी पुण्यातील पत्रकारपरिषदेत बोलताना छत्रपती संभाजीराजे यांच्यात धमक दिसत नाही. खासदारकीची मुदत संपत आली की आंदोलनाची, राजीनामा देईन, पक्ष काढेन अशी भाषा सुरु आहे. छत्रपती संभाजीराजे कोकणात आले? कधी कुठे आले, मला भेटले नाही. मला समजले असते, तर मी स्वागत केले असते, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन आरक्षण मिळत नाही आणि असे पुढारी होत नसतात. राजे हे समाजाने म्हणावे लागते. आता टर्म संपत आल्यावर राजेंनी राजीनामा देऊ नये. राजे फिरत आहेत पण आजूबाजूला रयत दिसत नाही. राजांना रयत भेटायला येते मग हे का फिरत आहेत? अशी टीका केली होती.