एसबीआयचा अहवाल; ९८ दिवस राहणार कोरोनाची तिसरी लाट, मोठ्या प्रमाणात लसीकरण हाच एकमेव उपाय


नवी दिल्ली – दुसऱ्या लाटेप्रमाणेच भारतामधील कोरोनाची तिसरी लाट ही अधिक घातक असू शकते. देशावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे गंभीर परिणाम होतील अशी शक्यता देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआयने) नुकत्याच जारी केलेल्या आपल्या अहवालामध्ये व्यक्त केली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत इतर देशांमध्ये काय घडले, याचा संदर्भ देत भारतामधील यंत्रणांना या अहवालामधून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कोरोना कालावधीत अर्थव्यवस्थेने कशी कामगिरी केली यासंदर्भातही भाष्य इकोरॅप नावाच्या या अहवालामध्ये करण्यात आले आहे.

एसबीआयच्या या अहवालामध्ये दिलेल्या माहितीनुसार ज्या मोठ्या देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट १०८ दिवसांपर्यंत होती, त्या देशांमध्ये तिसरी लाट सरासरी ९८ दिवसांपर्यंत टिकली. तसेच इतर देशांमधील ट्रेण्ड पाहिल्यास तिसऱ्या लाटेमध्ये दुसऱ्या लाटेपेक्षा १.८ पट अधिक रुग्ण आढळून येतील. जागतिक स्तरावर दुसऱ्या लाटेमध्ये पहिल्या लाटेपेक्षा ५.२ पट अधिक रुग्ण आढळून आले होते. भारतामध्ये मात्र पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत ४.२ टक्के अधिक रुग्ण आढळून आलेले. ही सराकरी जागतिक सरासरीपेक्षा कमी होती.

जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये येऊन गेलेल्या तिसऱ्या लाटांचा अभ्यास केला असता भारतामधील तिसरी लाट अधिक धोकादायक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पण त्याचवेळी कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी चांगल्या पद्धतीने, सुनियोजित कार्यपद्धतीचा अवलंब करत तयारी करण्यात आली तर या लाटेचा धोका आणि परिणाम कमी करण्यात यश मिळू शकते, असेही अहवालात म्हटले आहे. गंभीर प्रकरणांची संख्या तसेच मरण पावणाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी पूर्ण तयारीने या लाटेचा सामना करणे गरजेचे असल्याचे अहवालात म्हटले आहे.

चांगल्या पद्धतीने आरोग्य व्यवस्था काम करण्यासाठी मूलभूत सुविधा आणि लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. गंभीर रुग्णांची संख्या या दोन गोष्टी केल्यास २० ते ५ टक्क्यांपर्यंत कमी करता येईल, असा विश्वास व्य्कत करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आणि आरोग्य व्यवस्थेला बळकटी दिल्यास परिस्थिती दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक चांगली असू शकते. एक लाख ७० हजार जणांचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यू झाला आहे. पण आरोग्य सुविधा आणि लसीकरणाच्या जोरावर तिसऱ्या लाटेतील मृतांची संख्या ४० हजारांवर थोपवता येईल, असे एसबीआयच्या अहवालात म्हटले आहे.

लहान मुलांसाठी तिसरी लाट ही धोकादायक ठरु शकते, असे एसबीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळेच जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. सर्वात आधी लहान मुलांचे लसीकरण करणे गरजेचे असल्याचे या अहवालात म्हटले आहे. देशामध्ये १५ ते १७ कोटी मुले ही १२ ते १८ वयोगटातील असून त्यांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मोठा फटका बसण्याची शक्यता असल्यामुळे लसीकरणामध्ये या मुलांना प्राधान्य दिले जावे, असे एसबीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे.