गेल्या 24 तासात देशात कोरोनामुळे मृत्यु होणाऱ्यांच्या संख्येत पुन्हा वाढ


नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात देशात 1,32,788 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून 3207 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 2,31,456 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल एकाच दिवसात 1,01,875 सक्रिय रुग्णसंख्या कमी झाली आहे.

देशात आतापर्यंत एकूण 21 कोटी 85 लाख 46 हजार 667 कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत तर 35 कोटींहून जास्त कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशातील कोरोनाचा मृत्यूदर हा 1.18 टक्के आहे तर रिकव्हरी दर हा 92 टक्के इतका आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्या 50 टक्क्यांनी घटली आहे.

दर दिवशी रुग्णसंख्येत 1.3 लाखांची घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मागील आठवड्याभरापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने घटत आहे आणि ही अतिशय सकारात्मक बाब आहे. देशाचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता 92 टक्क्यांवर पोहोचले असून, दर आठवडयाला तब्बल 20 लाख कोरोना चाचण्या होत असल्याची माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे.

काल महाराष्ट्रात काल 14 हजार 123 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 34 हजार 949 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता राज्याचा रिकव्हरी रेट 94.28 टक्क्यांवर पोहचला आहे. याआधी 10 मार्च रोजी 13 हजार 659 रुग्णांची नोंद झाली होती. दरम्यान, मंगळवारी 477 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के झाले आहे. राज्यात सध्या 2 लाख 30 हजार 681 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात 54 लाख 31 हजार 319 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 96 हजार 198 रुग्णांना आतापर्यंत जीव गमावला आहे.