मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे आणि लवकरात लवकर सर्व गावे कोरोनामुक्त झाली पाहिजे. गाव कोरोनामुक्त झाले तर त्याद्वारे लवकरात लवकर तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून ‘कोरोनामुक्त गाव स्पर्धे’चे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या स्पर्धेची घोषणा केली.
महाविकास आघाडी सरकारकडून ‘कोरोनामुक्त गाव स्पर्धे’चे आयोजन; प्रथम येणाऱ्या गावाला मिळणार 50 लाख!
गावाच्या वेशीवरच कोरोनाला रोखलेल्या गावांचा गौरव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना केला होता. या उपक्रमास आता अधिक चालना देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
कोरोनामुक्त गावांना मिळणार इनाम
- कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये आणि 15 लाख याप्रमाणे इनाम दिले जाणार आहे.
- 6 महसुली विभागात प्रत्येकी 3 प्रमाणे राज्यात एकूण 18 बक्षीसे दिली जाणार. यासाठी बक्षीसाची एकुण रक्कम 5 कोटी 40 लाख रुपये असेल.
- कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना योजनांमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे.
- स्पर्धेत सहभागी गावांचे विविध 22 निकषांवर गुणांकन करण्यात येणार.
या स्पर्धेत राज्यातील सर्व गावांनी सहभागी होऊन आपले गाव लवकरात लवकर कोरोनामुक्त करावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.