कोरोना परिस्थितीचा बहाणा करुन निवडणुका आणखी दोन वर्षे पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा कुटिल डाव : आशिष शेलार


मुंबई : फेब्रुवारी 2022 मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. म्हणजेच निवडणुकीला जवळपास 9 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. पण निवडणुकीच्या आधीपासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेचा कोरोनाचे कारण सांगत मुंबई महानगरपालिका निवडणूक दोन वर्ष पुढे ढकलण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

शिवसेनाचा जुनी प्रभाग रचना बदलण्याचा डाव फसल्याच्या दावाही आशिष शेलार यांनी केला. ते म्हणाले की, शिवसेना किंवा काँग्रेसला जे प्रभाग आजन्म जिंकताच येणार नाही, अशा प्रभागांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरु आहेत. त्याचबरोबर त्यांनी पत्रकार परिषदेत नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही केला.

आशिष शेलार पुढे म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा बहाणा समोर ठेवून आता जनगणना करता येणार नाही, नव्याने मतदारनोंदणी करण्यात अडचणी येऊ शकतात. यामुळे आम्हाला जास्तीचा वेळ लागेल. म्हणजेच 2021 च्या जनगणनेवर नवीन प्रभागरचना करता येऊ शकेल, म्हणून आताच्या महापालिकेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांचा, सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारचा आणि शिवसेनेचा निवडणुका आणखी दोन वर्षे पुढे ढकलण्याचा कुटिल प्रयत्न सुरु आहे.

दरम्यान शिवसेनेने आशिष शेलार यांचे आरोप फेटाळले आहेत. शेलार यांच्या आरोपात काही तथ्य नाही. कारण गेल्या निवडणुकीत स्वत:च्या कार्यकाळात विभाग फोडून आकडे मिळवले, ते आता निसटून जात असल्याचे दिसल्यानंतर बेताल वक्तव्य केली जात आहेत. मुळात शिवसेना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. त्यांना वाटत असेल तर उद्याच निवडणुका घ्या, आम्हाला काहीच अडचण नाही. निवडणूक हा लोकशाहीचा भाग आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकर यांनी दिली.

तर हा आरोप करताना ते स्वत: भयभीत आहेत. निवडणूक वेळेत होणार आहेत. तारखा बदलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. बदलायचा असेल तर तो मुद्दा सरकारकडून सदनात येऊ शकतो. भाजपकडून बाष्कळ बडबड सुरु आहे. ती गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यास फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीवर मुंबई महानगरपालिका ठाम आहे. राज्य निवडणूक आयोगानेही त्यात मुंबई महानगरपालिका यंत्रणेला तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाची परिस्थिती पाहून जूनअखेर निर्णय घेण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने सांगितले. कोरोना संकटामुळे मुंबई महानगरपालिका निवडणूक होणार की पुढे ढकलणार अशी चर्चा सुरु झाली होती. त्यासंदर्भात पार पडलेल्या ऑनलाईन बैठकीत निवडणूक घेण्यावर ठाम असल्याचे मुंबई महापालिकाने सांगितले.