देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात, पण मृतांचा आकडा चिंता वाढवणारा


नवी दिल्ली : देशातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू कमी होत चालली आहे. पण मृतांच्या आकड्यात मात्र फारशी घट झाल्याचे पाहायला मिळत नाही. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 1 लाख 65 हजार 553 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3460 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2 लाख 76 हजार 309 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात आज सलग 17व्या दिवशी कोरोनाबाधितांच्या दैंनदिन रुग्णांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 46 दिवसांमधील सर्वात कमी कोरोनाबाधितांची आज नोंद करण्यात आली आहे. देशभरात 29 मे रोजी 21 कोटी 20 लाख 66 हजार 614 कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. तसेच एका दिवसापूर्वी 30 लाख 35 हजार 749 लसीचे डोसे दिले होते. तसेच आतापर्यंत 34 कोटी 31 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 20 लाख कोरोना चाचण्यांचे सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 8 टक्क्यांहून अधिक आहे.

देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.16 टक्क्यांवर आहे. तर रिकव्हरी रेट 90 टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन 8 टक्क्यांहून कमी झाली आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.

महाराष्ट्रात रोज कमी होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या पाहता कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. आज राज्यात 20,295 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 31 हजार 964 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता रिकव्हरी रेट 93.46 टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान आज 443 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरी भागात कोरोना बऱ्यापैकी आटोक्यात येताना दिसत आहे. पण, ग्रामीण भागात अजूनही कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहेत. राज्यात सध्या सहा जिल्ह्यांमध्ये नवीन कोरोना रुग्णसंख्या हजारच्या पुढे नोंद होत आहे. यात मुंबई 1038, अहमदनगर 1246, पुणे 1259, सातारा 2177, कोल्हापूर 1611 आणि सांगली 1063 असा समावेश आहे.

महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू आणि गोवा या राज्यांतील कोविड-19 चा प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन किंवा इतर निर्बंध पुढील पंधरादिवसांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर दिल्ली, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत निर्बंधांमध्ये थोडी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक देशात पुन्हा सुरु झाल्यामुळे कोरोना लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. अमेरिकेनंतर भारत हा दुसरा देश आहे ज्याने लसीकरणाचा 21 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. परंतु जर आपण लोकसंख्येच्या आधारे विचार केला तर आपण बऱ्याच देशांच्या मागे असल्याचे आकडेवारी सांगते. टक्केवारीनुसार पाहिले तर भारतात लसीकरणाचा वेग अत्यंत कमी आहे. तथापि, आपल्या देशात लसीकरणाचा वेग जूनपासून वाढण्याची अपेक्षा आहे. भारताने लसीकरणाचा 21 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी केवळ तीन टक्के लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. तर 12 टक्के लोकांनी पहिला डोस दिला आहे.